शिक्षण खंडित होऊ नये म्हणून दिली जाणारी शिष्यवृत्ती जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही…!

शिक्षण खंडित होऊ नये म्हणून दिली जाणारी शिष्यवृत्ती जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही…!

शिक्षण खंडित होऊ नये म्हणून दिली जाणारी शिष्यवृत्ती जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही…!

राष्ट्रीय साधने व गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना केंद्राने 2008 साली सुरू केली. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचं आठवी नंतरचं शिक्षण खंडित होऊ नये, त्यांचं माध्यमिक शिक्षण किमान शालांत परीक्षेपर्यंत पूर्ण व्हावं, यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देणारी ही योजना आहे; मात्र शालांत परीक्षा परीक्षा विद्यार्थी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेपर्यंत पोहोचले तरी त्यांची शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्याचा प्रकार ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत उघडकीस आला आहे.

कल्याणातील वैष्णवी नवनाथ मोहिते या विद्यार्थिनीचे उदाहरण या अनागोंदी करता देता येईल. कल्याणातील मिलिंद नगर भागात राहणारी ही विद्यार्थिनी प्रतिकूल परिस्थितीत आपलं शिक्षण घेते आहे. कल्याणातील कर्णिक रोडवरील नूतन विद्यालयातून आठवीत असताना तिने राष्ट्रीय साधने व गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेची परीक्षा दिली होती. ती चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाली. शाळेकडून शिक्षण विभागाला उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या बँक खात्यांची सविस्तर माहितीही पाठवण्यात आली.

ही शिष्यवृत्ती वैष्णवीसारख्या विद्यार्थ्यांनी नववी व दहावीचं शिक्षण अखंडित पूर्ण करावं, यासाठीची होती ; परंतु सरकारी उदासीनतेला या सगळ्याची बहुदा जाणीव नसते. वैष्णवी शालेय शिक्षण पूर्ण करून बाहेरही पडली. आता बिर्ला महाविद्यालयात बारावीचं शिक्षण घेते आहे. आजही तिचा आठवीतल्या शिष्यवृत्तीसाठी पाठपुरावा सुरू आहे.

कल्याणातील मिलिंदनगरमधील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे विद्यालयात वैष्णवीचं प्राथमिक शिक्षण झालंय. त्या शाळेतल्या शिक्षिका संध्या मोहपे गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी धडपडत असतात. त्यांचा त्यासाठी एक कन्यारत्न नावाचा उपक्रमही आहे. वैष्णवी त्यांची विद्यार्थिनी !

ठाणे जिल्हा शिक्षण विभाग आता विद्यार्थीनीने ऑनलाईन नोंदणी केलीय का, खातं उघडलंय का, शाळेने विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन अपडेट केलीय का, असे मुद्दे उपस्थित करून स्वतःचा बचाव करू पाहतोय, पण मूळात NMMS ची ऑनलाईन प्रणाली अलिकडे कार्यान्वित झालेली असून, वैष्णवीने २०१७-१८ मध्ये परीक्षा दिलेली आहे व तिचं शालेय शिक्षण सुरू असतानाच तिला शिष्यवृत्ती का मिळू शकली नाही, हा मुद्दा आहे. हा एकट्या वैष्णवीचा प्रश्न नसून तिच्यासारख्या कित्येकाचा आहे, अशी माहिती मीडिया भारत न्यूज कडे आलीय.

वैष्णवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासात नूतन विद्यालयातील शिक्षकांसोबतच संध्या मोहपेंचंसुद्धा महत्वपूर्ण मार्गदर्शन होतं. अनेकदा मोहपेंच्या घरीच वैष्णवी अभ्यासाला जायची. इतकी धडपड करूनही शिष्यवृत्तीची रक्कम वेळेस तिच्या पदरात न पडल्यामुळे तिच्या शिक्षिका मोहपेसुद्धा सरकारवर नाराज आहेत.

मीडिया भारत न्यूजशी बोलताना संध्या मोहपे म्हणाल्या की ही शिष्यवृत्ती आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचं शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी आहे. ती जर विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू असतानाच त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल तर या योजनेचा मूळ हेतूच विफल ठरतो.

आम्ही आमच्या स्तरावर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती विहित नमुन्यात शिक्षण विभागाला दिलीय. नोव्हेंबर, २०२० मध्ये शाळेने नव्याने पत्र पाठवलं. त्यालाही वर्ष होत आलंय. पण अजून शिष्यवृत्तीचा पत्ता नाही, अशी माहिती नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद यांनी मीडिया भारत न्यूज ला दिली.

यासंदर्भात मीडिया भारत न्यूज ने ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांना संपर्क साधला असता, ही माहिती धक्कादायक असल्याचं मान्य करून सदरबाबत तातडीने चौकशीचे आदेश देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

वैष्णवी व इतर विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम त्यांना मिळेलच ; परंतु त्यासोबत हा विलंब का झाला व त्याला कोण जबाबदार आहे, याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाईसुद्धा केली जाईल, शेषराव बढे यांनी म्हटलंय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!