मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
माणूस जेव्हा स्थिरस्थावर असतो, तेव्हा आपल्याच मस्तीत असतो. फार दूरचा विचार तो करत बसत नाही. मग अशातच निवांत वेळात जेव्हा देशवगैरे चर्चा होते, तेव्हा गर्दीचा भाग व्हायला त्याला आवडतं. पण गर्दीचा एकत्र येण्याचा उद्देश्य उन्माद असेल तर ती गर्दी क्षणभंगूर असते. ती नात्यात, आपुलकीत अगदी माणुसकीतही रुपांतरीत होत नाही. जेव्हा गर्दीतला सहभागी कोणी एकाकी पडतो, तेव्हा गर्दी ढुंकूनही पाहत नाही. व्यक्तिच्या लक्षात येतं, गर्व से कहो…वगैरे सगळं बकवास आहे, तोवर वेळ निघून गेलेली असते. भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकचं तेच झालं.
अनुपमा पाठक या भोजपुरी अभिनेत्रीने मुंबईत दहिसर येथील भाड्याने राहत असलेल्या घरात आत्महत्या केली. गेले अनेक दिवस ती अस्वस्थ होती. एक आॅगस्टला तिने आठेक मिनिटांचं फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्यात तिने आयुष्य संपवत असल्याचे संकेत दिले होते.
आपल्या समस्यांना लोक चेष्टेचा विषय करतात, चारचौघात आपली टिंगलटवाळी करतात, पण पुढे येऊन मदत कोणी करत नाही. लोक तुमच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करतात, आम्हाला सांगितलं असतं, तर आम्ही मदत केली असती, असंही बोलतात, पण ते ढोंग असतं. प्रत्यक्षात कोणीही मदत करत नाही, कोणी केलीच मदत तर त्यांना तुमचा फायदा उचलायचा असतो, अशी खंत अनुपमा यांनी लाईव्ह विडिओत व्यक्त केली होती.
तिचे एका कंपनीने पैसे बुडवल्याचं आणि एका परिचिताने स्कूटर हडपल्याचंही मृत्यूपूर्व चिठ्ठीतून समोर आलं आहे. अनुपमाचे विचार हिंदुत्ववादी होते. राजकीयदृष्ट्या भाजपा व मोदींची समर्थक होती. पुजापाठ करतानाचे अनेक फोटो तिच्या वाॅलवर आहेत. फेसबुक लाईव्हनंतर आठवड्याभराने
अनुपमाने आत्महत्या केली. याचाच अर्थ दरम्यानच्या काळात तिला कोणाचीही मदत झाली नाही, हे स्पष्ट होतं.
अनुपमा पाठकला आपल्या हिंदुत्वाचा अभिमान होता. पण तो तिला जगवू शकला नाही.