मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला राजकीय भूकंपाचे जबरदस्त धक्के बसत आहेत. भाजप समर्थक 6 आमदारांनी बंडखोरी केली, तर भाजपच्या तीन आमदारांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बिरेनसिंह सरकारला राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जात आहे.
मणिपूरमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाच्या एस. सुभाषचंद्र सिंह, टी.टी. हाओकीप आणि सॅम्युएल जेंदाई यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.या तिन्ही आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच अन्य मित्र पक्षाच्या आमदारांनीही मंत्रिपदांचा राजीनामा देऊन भाजपा सरकारला असलेला आपला पाठिंबा काढून घेतला आहे.
संगमा यांच्या नेतृत्वातील ‘नॅशनल पीपल्स पार्टी’च्या उपमुख्यमंत्री वाय. जोयकुमार सिंह, एन. कायिसी आणि एल. जयंताकुमार सिंह, लेतपाओ हाओकिप यांनी आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा दिला आहे. तसेच टीएमसीचे आमदार टी, रबींद्रो आणि अपक्ष आमदार शमसुद्दीन यांनी भाजपा सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे.
२०१७ मध्ये झालेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत ६० सदस्यीय विधानसभेत २८ जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर भाजपला २१ जागा मिळाल्या होत्या. परंतु भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून चार एनपीपी, चार एनपीएफ, एक लोजप, एक तृणमूल, एक अपक्ष आणि एक कॉंग्रेस बंडखोर अशा १२ जणांचा पाठिंबा मिळवून बहुमत गाठले.
सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसच्या अन्य सात आमदारांनीही सरकारला पाठिंबा दिला.
आजच्या घडीला भाजपकडे २३ सदस्यांचा पाठिंबा आहे. यात तिघांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपचे १८ , एनपीएफचे चार आणि लोजपचा एक असे आमदार आहेत.
काँग्रेसकडे स्वत:चे २० आमदार आहेत. एका सदस्याला अपात्र ठरवण्यात आले आहे, सात बंडखोरांना बंदी घातली गेली आहे तर भाजप मधून प्रवेश केले तीन आमदार आहेत.
News by Sagar Sanjivani Raghunath