मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये मनकर्णा नावाच्या एका 22 वर्षीय विवाहित युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय.12वी शिक्षण झालेल्या या युवतीचा विवाह पाच वर्षांपुर्वी धर्मापुरी नांदेड येथील राजेश कळकेकर या युवकासोबत विवाह झाला होता. तिला दोन लहानगी दुधपिती मुलं आहेत.
या युवतीला नवऱ्याचा आणि सासुचा सतत त्रास होता. सासूसुनेच्या भांडणामुळे एक महिन्यापुर्वी माजलगावमधील गेवराई रोडवरील विटभट्टीवर काम करण्यासाठी हे जोडपं आलं होतं. परंतु, काल सकाळी संबधित तरुणीला नवऱ्यानेच दवाखान्यात आणलं. त्यानंतर तिचा मृत्यू गळफासाने झाला असल्याचं डाँक्टरांनी पोलिसांना कळवलं.
नवऱ्याने मात्र तिच्या वडिलांना ‘मुलीला साप चावल्याने ती मेली’ असा निरोप दिला होता. पत्नीच्या एका पायाच्या जोडव्याच्या बोटाला खिळे टोचून सर्पदंशाने जखमा झाल्याचंही त्याने भासवलं होतं. बोटातून रक्त निघत असल्याचे युवतीच्या नातेवाईकांनी बघितल्याने ही हत्या असल्याचा त्यांचा संशय बळावला.
आपली मुलगी आत्महत्या करू शकत नाही. तिची लेकरं अंगावर पितं होती. तिचा जावयाने झोपेत असतानाच खून केलाय, असा वडिलांचा आरोप आहे. जावई सारखा पैशाची मागणी करत होता. दारू पिऊन बायकोला रोज मारायचा. इतक्यातच त्याला 20 हजार रुपये दिले होते. असं त्यांनी सांगितलं.
प्रथमदर्शी परिस्थिती आणि पीएम रिपोर्ट नुसार, पोलिसांनी भादंवि 306 आणि 498 नुसार सात लोकांवर गुन्हा दाखल केलाय. तपासात खुनाबाबत काही सिद्ध होत असल्यास हत्येचं कलम वाढवण्यात येईल, असे पोलीस उप अधिक्षक सुरेश पाटील यांनी सांगितलं.