मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
महाराष्ट्रातील औरंगाबादची घटना ताजी असतानाच आणखी एक बातमी उत्तप्रदेशातील औरीया जिल्ह्यातून आली आहे. आज पहाटे झालेल्या ट्रक अपघातात २४ कामगारांचा मृत्यू झाला असून, जवळपास २० मजूर गंभीर स्थितीत दवाखान्यात मृत्यूशी लढतायत.
लॉकडाऊन काळात लाखो कामगार हजारो किलोमीटरची पायपीट करत आपलं गावातलं हक्काचं घर गाठायचा प्रयत्न करत आहेत, शासकीय पातळीवर मदतीच्या मोठमोठ्या घोषणा रोज होतायंत, पण कामगारापर्यंत काही पोहचतच नाहीत. कामगारांना मूळ गावी सोडण्यासाठी रेल्वेगाड्याही सोडण्यात आलेल्या होत्या, पण त्या फार कमी प्रमाणात होत्या आणि अडकलेल्या मजुरांना पूर्णतः मदत करण्यात केंद्र आणि सर्व राज्यसरकारं अपयशी ठरताना दिसत होती.
त्यामुळे हे मजूर मिळेल त्या पर्यायाने सायकल, टेम्पो, मोटरसायकल काहीच नसेल तर हजारो किलोमीटर पायी निघालेले आहेत. पायी निघालेल्या मजुरांना वाटेतही पुरेशा सुविधा मिळालेल्या नाहीत.
असेच ५०-६० कामगार डीसीएम ट्रकने राजस्थान वरुन दिल्लीत पोहचले होते व पुढे त्यांना गोरखपूरला जायचे होते. पहाटे ३-३ः३० च्या सुमारास काही कामगारांनी चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली; त्यामुळे काही जण ट्रक मधून खाली उतरले होते आणि बाकी काहीजण ट्रकमध्येच झोपेत होते. त्याचवेळी राजस्थान कडून चुना भरुन येणाऱ्या आणखी एका भरधाव ट्रकने कामगारांच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक मारली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही ट्रकचा चक्काचूर झाला.आणि गाड्या रस्त्याच्या कडेला असलेल्या उतरंडीवर खड्ड्यात जाऊन पडल्या.
अंधार असल्यामुळे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक गाढ झोपेत असल्यामुळे इथे मदत पोहचायलाही बराच उशीर झाला. ह्या दरम्यानच्या काळात जे अधिक गंभीर जखमी होते त्यांना मृत्यूने गाठलं.
सर्कल अॉफीसर सुरेंद्रनाथ यादव ह्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की बऱ्याच कामगाराचा मृत्यू हा झोपेत झाला.तर काही जणांच शरीर अक्षरशः चेंदामेंदा झालंय.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांनी पुढील तपासाचे आदेश दिलेले आहेत. पण मृत मजूरांची ओळख पटवणं हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे, कारण एकाही मजुराकडे कसल्याच प्रकारची कागदपत्रे नव्हती. त्यामुळे २४ मजुरांचा मृतदेह कोणाकडे सोपवायचा?
प्रशासन गंभीर जखमी असलेल्या मजुरांच्या जबाबाची वाट पहातंय. त्यावरुन तरी काही जणांची ओळख पटेल. पण तो पर्यंत तरी ते मृतदेह हॉस्पीटलमध्येच पडून रहाणार आहेत.