मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
सिनेजगताबद्दल समाजात कायम एक कुतुहल असतं. आपल्याला दुरून केवळ झगमगती दुनिया दिसते, पण प्रत्यक्षात कित्येकांच्या आयुष्याला छुपी दु:खद किनार असते. असते छोटीसी बात, पण रजनीगंधा कधी कोमेजून जाते, तिचं तिलाच कळत नाही. विद्या सिन्हाचं असंच झालं. दहा हजार रूपये महिना देखभालीसाठी तिला नवऱ्याविरोधात न्यायालयीन संघर्ष करावा लागला होता. ती जिंकली होती, पण जगण्याच्या दगदगीत तिची दमछाक झाली आणि विद्या सिन्हाने या जगाचा निरोप घेतला.
विद्या सिन्हाचा जन्म १९४७ मधला. देशाला स्वातंत्र्य मिळून दोनच महिने झाले होते. काल देशातल्या स्वातंत्र्यदिनी तिचा श्वास थांबला. अलिकडच्या काळात फुप्फुसाच्या आणि ह्रदयाच्या विकाराने ती त्रस्त होती. नोव्हेंबरमध्ये तिला ७२ वर्षं पूर्ण व्हायची होती.
विद्या सिन्हाचं लग्न १९६८ मध्ये वेंकटेश्वरण अय्यरशी झाला. शेजारी राहताना हे नातं जुळलं. त्यांनी एक मुलगीही दत्तक घेतली होती, जान्हवी. १९९६ ला अय्यरचा मृत्यू झाला आणि विद्या सिन्हा सिडनीत निघून गेली. पुढे तिची आॅस्ट्रेलियातील डाॅ. नितीन साळुंखेशी जवळीक वाढली. दोघांनी लग्न केलं खरं, पण संसार चालला नाही. डाॅ. साळुंखेंविरोधात मानसिक व शारीरिक छळाची तक्रार पोलिसांत करण्याची पाळी विद्यावर आली. भांडणं घटस्फोटापर्यंत गेलं. विद्याने मुलीच्या देखभालीसाठी खर्च मागितला. न्यायालयाने तो मंजूर केला, पण डाॅक्टर अपीलात गेल्याने पदरात पडला नव्हता. २०११ मध्ये ते अपील विद्या सिन्हाच्या बाजूनेच लागलं.
विद्या सिन्हाची चित्रपट कारकीर्द अगदी दहा वर्षांची. त्यात तिने अवघे तीस चित्रपट केले. वडील चित्रपटक्षेत्रातच होते, पण विद्या या क्षेत्रात आली, स्वत:च्या हिंमतीवर. अठराव्या वर्षी ती माॅडलिंग करू लागली होती. आपल्या ऐन तारुण्यात मिस मुंबई राहिलेल्या विद्याला हेरलं बासु चटर्जींनी.
राजा काका पासून विद्याची सिनेमा इनिंग सुरू झाली. पण तिला रसिकमान्यता दिली, रजनीगंधा, छोटीसी बात, पती पत्नी और वो, इन्कार, तुम्हारे लिये, हवस, मुक्ती, किताब या चित्रपटांनी. उतारवयात छोट्या पडद्याने विद्याला साथ दिली. अनेक सिरिअल्स, जाहिराती ती करत राहिली. सलमान खानचा बाॅडिगार्ड हा तिचा अखेरचा चित्रपट.