मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
सततच्या चित्रे/बातम्या/सोशल मीडियाच्या भडिमारामुळे लोकांचा, विशेषतः तरुणांचा आणि मुलांचा “एकाग्र राहण्याचा ” वेळ १२ सेकंद इतका खाली आला आहे , मग ते लगेच “पुढच्या” विषयाकडे वळतात.
अमेरिकन सोशल मीडियांनी तर “अटेन्शन इंजिनियरींग” याचे शास्त्रच बनविले आहे, जे वापरून तुमचे डोके फेसबुकवरून बाहेरच निघू नये अशी योजना त्यात असते. यामुळे सर्व समाज “उथळ” कामे करणारा बनू लागला आहे.
“सखोल” काम किंवा अभ्यास करायचा असेल तर सोशल मीडियातून पूर्ण बाहेर पडावे लागावे अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे!. अर्थात ज्यांची उपजीविका (“दुकान”) , लोकसंपर्क सोशल मीडियावर अवलंबून आहे, त्यांना तिथे यावे लागणारच. पण तेही दिवसात दोनदा, गजर लावून पंचवीस मिनिटे इतकेच ठेवण्याची गरज आहे. नाहीतर दिवस “उथळ” गोष्टी वाचण्यात आणि एकमेकांकडे ढकलण्यातच जातो.
मेंदू ज्या विषयात व्यग्र असेल त्याच्या संबंधित मेंदूच्या पेशी हळूहळू एकमेकांशी विद्युत-संदेश-प्रणालीने “जडत” जातात. (“neurons which fire together , wire together!”), आणि ते कनेक्शन अधिक वापराने पक्के होत जाते. याचे चांगले (नवीन विषय शिकणे इत्यादीसाठी) आणि वाईट (वादासाठी सतत नवे मुद्दे शोधत राहणे वगैरे) असे दोन्ही परिणाम असतात.
चिखलातून जसा पाय काढून पुढे टाकायला वेळ लागतो (पाय अडकून पडलेला असतो!!!) तसाच वेळ मेंदूला विषय बदलायला लागतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर किंवा सोशल मीडियावर लॉग इन केल्यावर, आपण कोणत्या विषयात आज “उतरतो” आहोत, याचे तीव्र भान ठेवावे लागते, नाहीतर दोन-चार तास सहज जाऊ शकतात.
लेखक अमेरिकेत स्थायिक असून विविध विषयांवर ते समाजमाध्यमात अभ्यासपूर्ण लिखाण करीत असतात.