मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
कोरोनाने मुंबईची लाईफलाईन कधी ठप्प, तर कधी धिमी केलीय. खासगी चाकरमानी व व्यावसायिकांवर ट्रेनमध्ये नो एन्ट्री असल्याने उपासमारीची वेळ आलीय. पण त्यांच्याहीपेक्षा खडतर हाल आहेत, स्टेशनवरच्या बुटपाॅलिश करणाऱ्यांंचे !
पंधरा वर्षांपासून उल्हासनगर रेल्वे स्टेशनवर बुटपाॅलिश करणारा उमेश राम, या चौदा महिन्याच्या लाँकडाऊनने हतबल होऊन सरकारला विचारतोय , ‘ आम्ही सगळ्यांचे बुट चमकवतो, आमचं नशीब कोण चमकवणार ?
उमेश राम यांच्या गावी आईवडील, चार मुली आहेत. इथे बायकोसोबत राहतात. धंदाच नसल्याने दरमहा गावी पैसे पाठवणंही आता बंद झालंय.
सर्वसामान्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश नसल्याने दिवसागणिक ६०० – ७०० रुपये कमावणारे राम यांची रोजची कमाई दिडदोनशे रुपयांवर आलीय. ज्यातून ५४/- रुपये रेल्वेला रोजचं भाडं द्यावे लागते. क्रिम, रंग यात ३० – ४० रुपये जातात. चहा, दोन वडापाव खाल्ले तरी ४० रुपये जातात. मोठ्या मुश्किलीने ५०-एक रुपये उरतात.
गिऱ्हाईकं पाँलिश करण्याचे १० रुपयांपेक्षा अधिक पैसे देत नाहीत. यामुळे घरभाडं, दैनंदिन खर्च, आजारपण यांचा मेळ घालतांना राम यांच्या नाकीनऊ आलेत.
हीच स्थिती देशभरातील बुटपाँलीश करणाऱ्यांची असावी.
मुंबईच्या सेंट्रल – पश्चिम रेल्वे स्थानकावर साधारणत: ३५००० पेक्षा अधिक बुटपाँलीश करणारे आहेत. तर देशात लाखो असतील. ज्यांच्या छोट्यामोठ्या संघटना आहेत. ज्यांची शासनदरबारी असंघटित कामगार म्हणूनही नोंद नाही.
कल्याण, टिटवाळा, उल्हासनगर, शहाड, ते अंबरनाथ दरम्यान कार्यरत ‘ ठाणे जिल्हा बुटपाँलीश संघटनेचा ‘ उपाध्यक्ष उमेश राम व त्याच्या समव्यवसाय करणाऱ्यांना कोरोनापेक्षाही घातक असा उपासमारीचा आजार जडलाय.
ट्रेन फलाटावर थांबताच उतरणाऱ्या प्रवाशांच्या बुटांकडे आशाळभूत नजरेने पाहणाऱ्या उमेश राम यांच्यासह लाखो बुटपाॅलिश करणाऱ्यांच्या नजरा सरकारकडे लागून राहिल्यात.
राम म्हणतात, ” सरकार रिक्षावाल्यांना, किन्नरांना १५०० रूपयांची मदत करतेय. पण आमच्यासारख्यांचं काय?