मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
१४० या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांका वरून आलेला फोन कॉल रिसीव केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते असे जे संदेश समाज माध्यमावर फिरत आहेत. त्या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाने केला आहे. एका विडिओमुळे लोकांत निर्माण झालेल्या घबराटीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना स्पष्टीकरण द्यावं लागलंय.
“त्या” विडिओत पोलिसच १४० क्रमांकापासून सावध राहण्याचं आवाहन करताना दिसताहेत. शिवाय तोंडावर मास्क लावलेला असल्याने विडिओ अलिकडचाच असल्याची लोकांची खात्री पटली आणि भयापोटी त्या विडिओचा वेगाने प्रसार झाला. मात्र, महाराष्ट्र किंवा मुंबई पोलिसांच्या कोणत्याही सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर अशा आवाहनाचा कसलाही उल्लेख नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
आता तो विडिओ एका दूरचित्रवाहिनीने एका कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी प्रसारित केल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान १४० क्रमांकावरून घाबरण्याचं कारण नसल्याचं पोलिसांनी ट्वीट केलंय.
जोपर्यंत आपण, बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड चे पूर्ण नंबर तसेच सी. व्ही. व्ही./ पिन नंबर शेअर करीत नाही, तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे, अशी सूचना पोलिसांनी केलीय.
जर आपणास १४० ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरु नये/ पॅनिक होऊ नये. हे क्रमांक टेलिमार्केटिंग करिता दिले गेलेले असतात, अशी माहिती महाराष्ट्र सायबरने ट्वीट केली आहे.
सोबत पोलिसांनी नागरिकांना दक्ष राहण्याचं आवाहन केलंय. अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास व ओटीपी सह आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, डेबिट/ क्रेडिट कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट/ क्रेडिट कार्डची माहिती अथवा पिन नंबर/ ओटीपी देऊ नये अथवा दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलंय.
News by MediaBharatNews Team