मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
एका वकिल महिलेला सर्वांसमक्ष पोलीस ठाण्यात अपमानास्पद वागणूक दिल्याच्या व तिच्या शिक्षणाची खिल्ली उडवण्याच्या आरोपावरून बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. उल्हासनगर तालुका बार एडवोकेटस् फाऊंडेशनने गावडे यांच्या निलंबनाची मागणी पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एड. पूजा कांबळे यांच्या जागेत अतिक्रमण होत असल्यावरून विवाद सुरू होता. याच प्रकरणात संबंधितांविरोधात तक्रार देण्यासाठी त्या पोलिस ठाण्यात गेल्या होत्या.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता गावडे यांनी त्यांची तक्रार ऐकून न घेता उलट पूजा कांबळे यांची खिल्ली उडवली. त्यावेळी त्यांच्या दालनात असलेले इतर लोक त्यांच्यावर हसत होते. ‘तू अर्धवट वकील आहेस’, अशी सुद्धा शेरेबाजी दत्ता गावडे यांनी केल्याचा पूजा कांबळे यांचा आरोप आहे.
ही घटना घडल्यानंतर त्याचा विपरीत मानसिक परिणाम होऊन एड. पूजा कांबळे निराशावस्थेत गेल्या आणि त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा त्यापूर्वीचा आत्महत्येचा इशारा देणारा व्हिडीओ समाजमाध्यमसुद्धा प्रसारित झाला आहे. सध्या त्या अंबरनाथमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे.
या घटनेनंतर उल्हासनगर तालुका बार एडवोकेट फाऊंडेशन सक्रिय झाली असून समितीने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेऊन वकील संघटनेने आपले निवेदन सादर केलंय. या निवेदनात दत्ता गावडे यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्तांनी चौकशी करण्याचं आश्वासन दिल्याचं फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे यांनी मिडिया भारत न्यूज ला सांगितलं.
पुजा कांबळे ह्या सामान्य नागरिक आहेत, महिला आहेत, सुशिक्षित युवा आहेत, वकील आहेत…अशा तक्रारदाराशी संवाद साधण्याचं तारतम्य नसलेल्या दत्ता गावडेंसारख्या अधिकाऱ्याची जनसंपर्क येईल अशा जागी नेमणूक असू नये, अशी प्रतिक्रिया देत एड. कल्पेश माने यांनी मिडिया भारत न्यूज शी बोलताना गावडेंच्या निलंबनाच्या मागणीचं समर्थन केलंय.
मिडिया भारत न्यूज ने वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता गावडे यांच्याशीही संपर्क साधला. ते म्हणाले, हे सगळं कुभांड आहे.
गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा कांबळे यांचा जमीनीचा वाद नात्यातलाच आहे. त्या पोलिस ठाण्यातला जो प्रसंग सांगताहेत, तो २८ जून रोजीचा आहे. त्यांनी प्रसारित केलेला विडिओ १७ जुलैचा आहे. भावाला मारहाण झाल्याची घटना ११ जुलैची आहे, पण तत्संदर्भात पोलिसांत कसलीही नोंद नाही.
मूळात दिवाणी प्रकरणात तेही नात्यातल्याच जमीन व्यवहारात पुजा यांना फौजदारी कारवाईची अपेक्षा होती. अतिक्रमणाविरोधात पालिकेकडे किंवा संबंधित शासकीय कार्यालयाकडे तक्रार करावी, अशी सूचना करत असताना त्या आपलं म्हणणं रेटत होत्या, त्यावेळी ‘ तुमचं कायद्याचं ज्ञान अर्धवट आहे’, हे तोंडातून सहज निघालेलं वाक्य आहे. मुद्दाम अपमान करावा, असं काही ध्यानीमनीही नव्हतं. असं वपोनि दत्ता गावडे यांनी मिडिया भारत न्यूज ला सांंगितलं.
२८ जूननंतर पुजा कांबळे गावडेंना भेटलेल्या नाहीत. ‘मग २० दिवसांनंतर त्यांना अकस्मात अपमान आठवून त्याचं वाईट वाटलं का’, हा गावडेंचा सवाल आहे.