मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
प्रति,
राज्यपाल, महाराष्ट्र
आपण राज्यातील विद्यापीठांचे कुलपती त्यामुळे हे पत्र आपल्याला उद्देशून लिहित आहे. सद्या महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांच्याबाबत सुरू असलेल्या गोंधळाविषयी आपण अवगत असालच आणि ह्या सबंधी अनेक सुचना, प्रस्ताव राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलपती ह्या नात्याने तुमच्याकडे आले असतीलच. पण मे महिना संपत आला तरी ह्या परिक्षांचा निर्णय होत नाहीये आणि ह्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे हे मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे.
करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती इतकी भीषण आहे की देश गेले दोन महिने टाळेबंदीत आहे आणि सध्याची किमां मुंबई आणि पुणे परिसरातील परिस्थिती पाहता हा भाग अजून किती काळ टाळेबंदीत राहिल, ह्याचं भाकीत कोणीच करू शकत नाही. बरं, जर टाळेबंदी शिथिल झाली तर ह्याचा अर्थ करोना संपला असा होत नाही हे आपण देखील जाणता. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?
ह्या रोगाचा प्रादुर्भाव किती जबरदस्त आहे, हे तुम्ही देखील जाणता असं मी मानतो. मग इतक्या मोठ्या संख्येने ह्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात घालण्यामागचं नक्की प्रयोजन काय? टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचं होणारं अपरिमित नुकसान जाणूनदेखील देशाने इतकी मोठी टाळेबंदी झेलली. का तर जीव वाचला तर पुढचं सगळं शक्य आहे. मग ह्याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे?
बरं परिक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट विद्यार्थ्यांना पास करणं असा अर्थ होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या किंवा महाविद्यालयांनी घेतलेल्या अंतर्गत परिक्षांच्या गुणाच्या आधारावर किंवा त्यांना काही प्रोजेक्ट्स देऊन किंवा इतर अनेक पद्धतीने विद्यार्थ्यांचा अंतिम परिक्षेचा निकाल जाहीर करता येईल. मला खात्री आहे, अनेक शिक्षणतज्ञांनी ह्या विषयीचे मार्ग तुम्हाला सुचवले असतील; पण जर ते नसतील तर आमचं शिष्टमंडळ विद्यापीठांना याविषयी नक्की मार्गदर्शन करेल.
आज मुंबई विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी अनेक किलोमीटर प्रवास करुन त्यांच्या परिक्षाकेंद्रांना पोहचतात. आजच्या परिस्थितीत ह्या अशा हजारो विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर पोहचणंसुद्धा शक्य होणार नाही. आज करोनामुळे अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. किमान त्यात परिक्षा लांबणीवर पडण्याची टांगती तलवार तरी त्यांच्या डोक्यावर नको.
त्याऐवजी आधीच्या गुणांच्या आधारे निकाल निश्चितीचं एक प्रारुप लवकर ठरवून अंतिम परिक्षांचे निकाल लागले तर किमान ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मार्ग मोकळा होईल. आज एमबीएपासून इतर परिक्षांच्या सीइटीचे निकाल लागलेत; पण विद्यार्थांना त्यांच्या पदवी परिक्षेविषयी अनिश्चितता आहे, ह्याला अर्थ नाही.
निव्वळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन ह्या परिक्षा रद्द कराव्यात आणि ह्यात कुठल्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये ही विनंती.