मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
दिनांक १६ मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील सुखदेव विहार येथे श्रमिक मजुरांची भेट घेतली. या भेटीची बातमी अनेक वृत्तसंस्थांनी दाखविली ज्यातील फोटो मध्ये राहुल गांधी या श्रमिक मजुरांसोबत फुटपाथवर बसून चर्चा करताना दिसत आहेत. परंतु, समाजमाध्यमातून आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक फोटो प्रसारित झाले आणि त्यानंतर ही (भेट) पूर्वनियोजित आणि नाटकी होती, अशा चर्चांना उधाण आले आहे. नक्की काय आहे या चर्चेमागचं सत्य जाणून घेऊया .
दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भेटीनंतर विरोधी पक्षाकडून या भेटीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून ती पूर्वनियोजित असल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्या. ही सत्यता पडताळण्यासाठी दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अजय चौधरी आणि सोबतच उत्तर पूर्व दिल्लीचे डी सी.पी आर. पी.मीना यांच्याकडून माहिती घेण्यात आली.
१६ मे रोजी राहुल गांधी याच परिसरातून जात होते, त्यावेळी त्यांच्या सोबत दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अजय चौधरी हे सुद्धा होते. गाडीतून जात असताना या मजुरांना पाहून राहुल गांधी थेट रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या मजुरांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.
यानंतर त्यांनी या मजुरांना अपेक्षित मदतीचे आश्वासन दिले आणि अजय चौधरी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या घरी पोहोचण्याची व्यवस्था देखील केली.
या सगळ्यानंतर राहुल गांधी यांनी हे सर्व ठरवून केले आहे व आधीच सर्व काही मजुरांना सूचित करण्यात आले होते अश्या पद्धतीचा मजकूर समाज माध्यमातून पसरवण्यात आला. ज्यामध्ये ते संवाद साधत असलेल्या कुटुंबातील महिलेचा फोटो दाखवला जात आहे, तीच महिला नंतर इनोव्हा गाडीतून जाताना दिसत आहे.
याबाबत उत्तर पूर्व दिल्लीचे डी सी पी आर पी मीना यांनी सुद्धा अजय चौधरी यांच्या माहितीला दुजोरा दिला आहे. पोलीस या मजुरांना तेथून हुसकावण्याचे काम करत असताना, राहुल गांधी व अजय चौधरी या जागी पोहोचले आणि पोलिसांना याबाबत विचारणा केली.
त्यावर पोलिसांनी सांगितले की,
तुम्ही यांची जाण्याची काही व्यवस्था करत असाल तर आमची काहीच हरकत नाही” व यानंतर मजुरांना घरी पाठवण्याचे काम सुरू झाले मजुरांना पोहोचवण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली तसेच यामध्ये काही कार सुद्धा होत्या. त्यातूनच हे मजूर आपल्या गावी परतले.
एकंदरीत घटनेचा क्रम पाहता आणि सर्व संदर्भ घटनाक्रम लक्षात घेता राहुल गांधींची मजुरांशी झालेली भेट पूर्वनियोजित नव्हती म्हणजेच ती आकस्मिकपणे घडून आली होती, असं स्पष्ट दिसतं.