'बरं झालं भाजपसोबत युती झाली नाही, नाहीतर उल्हासनगरात होर्डिंगवर माझ्यासोबत पप्पू कलानीचाही फोटो दिसला असता, ही भीती २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती ; परंतु आता सत्तेच्या मोहापायी ती भीती ते स्वतः खरी ठरवू पाहत आहेत.
उल्हासनगर महानगरपालिकेत आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोबत शिवसेनेची युतीची बोलणी सुरू आहेत. उल्हासनगरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ची सगळी सूत्रं पप्पू कलानीच्या हातात आहेत. किंबहुना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आणि शिवसेना पप्पू कलानीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढतील, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
अशावेळी युतीच्या उमेदवारांच्या होर्डिंगवर पप्पू कालानीची छबी झळकणार, हे उघड आहे. त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेली भीतीसुद्धा खरी ठरेल, हेही आता पुरेसं स्पष्ट झालं आहे.
पप्पू कालानी आणि गुन्हेगारी हे एक समीकरण आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण ही संज्ञा महाराष्ट्रात रुजली तेव्हा तिचा केंद्रबिंदू पप्पू कालानीच होता.
सद्यस्थितीत पप्पू कालानीला हत्याप्रकरणात जन्मठेपेची सजा लागलीय व कोविडचं निमित्त करून महाविकास आघाडी सरकारने निवडणुकीसाठी कालानीला पॅरोलवर बाहेर आणलंय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पप्पू कालानीसोबत आपला फोटो झळकवण्यास परवानगी देतील का, हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे.
उल्हासनगरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आणि शिवसेना यांची युतीची बोलणी सुरू असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला असून, आपल्याच सूचनेनुसार ही बोलणी सुरू आहेत, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. केवळ उल्हासनगरचा नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ही युती व्हावी म्हणून आपले प्रयत्न सुरू आहेत, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.