कायद्याने वागा लोकचळवळ कशासाठी ?

                    

 

कायद्याने वागा लोकचळवळ भारतीय संविधानालाच आपली विचारप्रणाली मानून वाटचाल करणारी समाज परिवर्तनाची प्रक्रिया आहे. परिवर्तन म्हणण्यापेक्षा समाज प्रबोधन म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याबाबत नागरिकांचं प्रशिक्षण झालं नाही. पुढे २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक झाला. म्हणजे नेमका काय झाला, ते कुणी नीट समजावून सांगितलं नाही.

ज्यांना पदव्या घ्यायच्यात त्यांनी अभ्यासाचा भाग म्हणून वाचलं , लक्षात ठेवलं आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देऊन गुण मिळवले. पण ते जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवायला हवं होतं , ते झालं नाही. साधं सरळ गणित आहे. लोकांना जे घडवायला किंवा घडायला हवं आहे, ते घडवून आणण्याची संधी त्यांना लोकशाही देते. लोकांनी लोकांमधूनच लोकांचे प्रतिनिधी निवडायचे आणि त्यांनी सरकार म्हणून प्राप्त अधिकारांच्या आधारे लोकाभिमुख धोरणात्मक निर्णय घ्यायचे.

लोकशाही व्यवस्थेत असं सरकार निवडून आणण्यासाठी निवडणुकीचं माध्यम आहे. ज्यांच्याकडे बहुमत असतं, त्यांचं सरकार बनतं. किंवा ज्या विचारांचे लोक निवडून जातात, त्या विचारांचा सरकारवर व स्वाभाविकच सरकारच्या निर्णयांवर प्रभाव असतो. त्यामुळे आपल्या विचारांचं बहुमत हवं. निःपक्षपातीपणे सांगायचं तर ज्यांचा देशातल्या संविधानिक मूल्यांवर व त्यावर आधारित व्यवस्थेवर विश्वास आहे, अशा लोकांचं बहुमत असायला हवं. त्यावर निवडणुकीच्या वेळेस काम करून काहीच उपयोग नसतो. ते अखंड काम आहे. कायद्याने वागा लोकचळवळीची स्थापना त्यासाठीच करण्यात आली आहे.

देश, नागरिकत्व, स्वातंत्र्य, लोकशाही,, प्रजासत्ताक, निवडणुकांचं महत्त्व , आपले अधिकार, संविधानिक हक्क याबाबत शक्यतोवर सरळसोप्या भाषेत जनजागृती करून जबाबदार नागरिकांचा देश घडवणं हे कायद्याने वागा लोकचळवळीचा उद्देश्य आहे.


           

एका चांगल्या संविधानिक समाजाच्या निर्मितीसाठी कायद्याने वागा लोकचळवळ ही पायवाट आहे !

 (राज असरोंडकर यांची ५ मार्च २०१९ रोजीची फेसबुक पोस्ट)
 
 
११ मार्च २०१९ रोजी कायद्याने वागा लोकचळवळीला १० वर्षे पूर्ण होताहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेकजण आता कायद्याने वागाशी परिचित आहेत. आपापल्या तत्वप्रणालीपेक्षा देश आणि देशाचं संविधान यांना प्राथमिकता देणारा हा खटाटोप आहे. जातीपाती, धर्मप्रांत यांच्या पलीकडे केवळ भारतीय म्हणून लोकांना तिरंग्याखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे कायद्याने वागा लोकचळवळ. आज वेगवेगळ्या विचारसरणीचे युवक एकमेकांच्या विचारांचा अर्थात मतभेदांचा आदर करत कायद्याने वागा मध्ये एकत्र वावरताहेत. नियमित बैठकांत मतभेद असलेल्या विषयांवर समोरासमोर चर्चा करताहेत. एकमेकाला जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करताहेत. सरतेशेवटी आमची बांधिलकी भारतीय संविधानाशी आहे.
 
आमचा इझम भारतीय संविधान आहे. कोणत्याही प्रकारच्या वैचारिक, धार्मिक, जातीय कट्टरतेला आमचा ठाम विरोध आहे. आपले म्हणणे शांतपणे, संविधानिक पद्धतीने मांडण्यावर आमचा विश्वास आहे. भारतीय संविधानांत नमूद केल्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवर श्रद्धा आणि उपासना याचं स्वातंत्र्य आम्ही मान्य करतो, त्याचवेळी भारतीय संविधानाने पुरस्कार केलेला विज्ञानवादाचा मार्ग आम्हाला प्राधान्याचा वाटतो. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मुलभूत तत्वे आम्हाला प्राणप्रिय आहेत. आम्हाला या देशात खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आणायचं आहे.
 
शिक्षण, आरोग्य, परिवहन हे विषय आमच्या सर्वाधिक प्राधान्यावर आहेत. या क्षेत्रात खाजगीकरण असू नये व कोणाही सर्वसामान्य नागरिकास परवडू शकेल अशी दर्जेदार अद्ययावत सेवा देण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारनेच घेतली पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे. केजी टू पीजी प्रत्येकाला संपूर्ण मोफत शिक्षण असलं पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. यासोबत नागरिकांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्वतः सक्षम व्हावं, त्यासाठी त्यांनी सरकार, प्रशासन नावाची व्यवस्था समजून घ्यावं, नियम कायदे समजून घेऊन त्यांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरावा, सरकारांची कार्यपद्धती सहजसोपी, सुटसुटीत, पारदर्शी असावी यासाठी जनजागृती, पाठपुरावा, प्रसंगी आंदोलने अशी आमची धडपड सुरु आहे.
 
बदल होईल, याबाबत आम्ही आशावादी आहोत. एक ना एक दिवस लोक भावनिक प्रश्न बाजूला सारून राजकीय फसवेगिरीला बळी न पडता, आपल्या जीवनमरणाच्या प्रश्नांना प्राधान्य देतील, निवडणुकीनंतर नामानिराळे न राहता सतत राज्यकर्त्यांना निर्भयपणे जाब विचारतील, राज्यकारभारावर स्वतःचा वचक निर्माण करतील आणि पुढे प्रजासत्ताकाचं महत्व ओळखून लोकाभिमुख सत्ता असावी म्हणून सद्सद्विवेकाने लोकाभिमुखच लोकप्रतिनिधी निवडून देतील, याची आम्हाला खात्री आहे. आमची धडपड त्यासाठीच आहे. एका चांगल्या संविधानिक समाजाच्या निर्मितीसाठी कायद्याने वागा लोकचळवळ ही पायवाट आहे.
 
 
 

 

(राज असरोंडकर यांची १४ मार्च २०२० रोजीची वाढदिवसाच्या सदिच्छांना आभार मानतानाची फेसबुक पोस्ट)
 
 

माझा बुद्ध कुणाचा द्वेष करत नाही;

माझा आंबेडकर कुणाला इजा करत नाही  !

 
 
ही दोन प्रमुख कारणं आहेत, ज्यामुळे माझ्या वाढदिवसाला अनेकांनी लिहिलं की राज शांत, संयमी आहे. तसा मी नसेन तर माझं बुद्धिझमशी सांगत असलेलं नातं कुचकामी ठरतं. माझं आंबेडकरी विचारांचा असल्याचा दावा करणंही बनावट ठरतं. जेव्हा आपण एखादा वैचारिक मार्ग अनुसरतो, तेव्हा त्या मार्गावर चालण्यासाठी म्हणून आवश्यक बदल टप्प्याटप्प्याने करत जाणं ही अपरिहार्यता आहे. त्याशिवाय आपण त्या मार्गावरचं अंतिम ध्येय गाठू शकत नाही. कदाचित आपल्या हयातीत शक्य होणार नसेल, त्या मार्गावर न थकता चालत राहणाऱ्यांची फळी तयार असणजेव्हा लोकचळवळीचं नावच कायद्याने वागा आहे तेव्हा हे स्वाभाविक असणार की लोकचळवळ संविधानिक मार्ग अनुसरणारी असणार ! त्यासाठी लोकचळवळीत कार्यरत मंडळीही संविधानिक स्वभावाची असणं अपेक्षित आहे. संविधानिक म्हणजे केवळ संविधानातील तरतूदींवर भरभरून बोलणारे, संविधान मानणारे, संविधानाबद्दल आदर असणारे किंवा संविधानाचा जयजयकार करणारे, इतकं मर्यादित नाही तर संविधान प्रत्यक्षात जगणारे लोक अपेक्षित आहेत.
 
तोंडात कळतनकळत आईबहिणींवरून केली जाणारी शिवीगाळ असणारे लोक कितीही दावा केला तरी संविधानिक असूच शकत नाहीत. जात तथाकथित वरची असो की खालची, स्वत:ला संविधानिक समजणाऱ्या व्यक्तिकडून कोणत्याही जातीधर्माबद्दल कोणत्याही परिस्थितीत कुजकट कुत्सित बोलणं अपेक्षित नाही. एखाद्याला महारड्या म्हणून हिनवणं जितकं वाईट तितकंच भटुरड्या म्हणून उल्लेख करणंही आक्षेपार्हच. हे आपण शक्य तितक्या लवकर लक्षात घेऊ तितकं सगळ्यांच्याच हिताचं !
 
आजचं देशातलं वातावरण जे गढूळ झालंय, त्याचं कारण जातधर्मप्रांताच्या तुलनेत देश दुय्यम ठरला. तो ना समजून घेतला गेला, ना समजाऊन सांगितला गेला. समजाऊन म्हणजे समोरच्याच्या सम (पातळीवर) जाऊन !!! कायद्याने वागा लोकचळवळ न थकता हे काम करते. आपापला ईझम म्हणजे देश नाही. कोणताही एक ईझम म्हणजे देश असू शकत नाही. संविधानकारांनी सगळ्या ईझमचं खूप व्यवस्थित समन्वयन केलं आहे; म्हणून संविधानालाच ईझम मानलं की देश समजून घ्यायला सोपं जातं. नागरिक कुठल्याही विचारांचा असो, तो आपल्या देशाचा नागरिक आहे, ही भावना जपली की संवाद साधणं सुकर होतं. अगदी वैचारिक मतभेद असले तरीही ! देशाची काळजी करताना माणसं तुटणार नाहीत, याला प्राधान्य द्यायला हवं. कायद्याने वागा लोकचळवळ असा व्यापक दृष्टिकोन ठेवते. दिवसेंदिवस अधिकाधिक जबाबदारीचं भान कायद्याने वागा लोकचळवळ आम्हां सगळ्यांनाच देतेय.
 
भोवतालचं वातावरण आव्हानात्मक आहे. एखादं विषाणूयुद्ध असावं तसा समोरून मारा होतोय; मैदानात उतरून समोरासमोर नव्हे; तर छुपा !!! या युद्धाला घाईगडबडीत प्रत्युत्तर देणं धोकादायक ठरू शकतं. जां निस्सार अख्तर यांचा शेर आहे, ” ये क्या है कि बढ़ते चलो बढ़ते चलो आगे, जब बैठके सोचेंगे, तो कुछ बात बनेगी.”
 
आपण सगळे सोबत आहोतच. पण आपल्या सदिच्छांनी मनोबल अधिक वाढतं, जबाबदारीची अधिक जाणीव होते आणि स्वत:ला विनम्रपणे जोखताही येतं…म्हणूनच सर्वांचे खूप खूप आभार !!!माणसांचे धन मजकडे, माणसेच संपत्ती
गडगंज माणुसकीचा मालक मी

राज असरोंडकर कायद्याने वागा या लोकचळवळीचे प्रणेते आहेत. दहा वर्षापूर्वी उल्हासनगर या आपल्या राहत्या शहरातून राज असरोंडकर यांनी या लोकचळवळीची स्थापना केली. आज ती चळवळ महाराष्ट्रभर पसरते आहे. विशेषतः युवा वर्ग या चळवळीकडे आकृष्ट झाला आहे. कायद्याने वागा लोकचळवळ संविधानिक मार्गांचा आग्रह धरते व त्यासाठी प्रसार प्रचाराचं काम करते. संविधान हाच आमचा ईझम आहे, असं ही चळवळ सांगते, यातच सगळं आलं.

मुंबईत महापालिका शाळा आणि दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात शालेय शिक्षण झाल्यावर राज रूपारेल काॅलेजात विज्ञान शाखेत गेले. तिथून पुढे त्यांनी व्हिजेटीआय काॅलेजात डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग ला प्रवेश घेतला. पण राज यांचा जीव त्यात रमला नाही आणि ते पत्रकारितेकडे वळले. आपलं महानगर, आज दिनांक, सकाळ, लोकसत्ता, चित्रलेखा, वृत्तमानस आदी नियतकालिकांतून त्यांनी पत्रकारिता केली. एका जागरूक कार्यकर्त्याचा पिंड त्यांच्यात उपजत आहे.

२००२ ते २००७ ते उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक होते. प्रभाग समितीचं सभापतीपद त्यांनी भुषवलंय. एक अभ्यासू आणि आक्रमक नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती होती. शासनाच्या संजय गांधी निराधार योजना तसंच रेशनिंग समितीवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केलंय. २००९ ला कायद्याने वागा लोकचळवळ सुरू केल्यावर त्यांनी महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था, झिम्माड काव्यसमूह, बोरूची शाळा, मिडिया मेलडी कराओके क्लब, रो, उर्जासावित्री, मिडिया भारत न्यूज असे विभाग सुरू करून कला, साहित्य, संगीत, शैक्षणिक तसंच वृत्तमाध्यम क्षेत्रात अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले.

बोरूची शाळा मार्फत त्यांनी गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांत लेखन वाचन कौशल्य विकासाची चळवळ राबवली. उल्हासनगरातील पद्मश्री मोहंमद रफी फॅन्स क्लबचे ते समन्वयक आहेत. मिडिया कन्सेप्टस् हा त्यांचा उदरनिर्वाहाचा मार्ग आहे. माणूस प्रकाशनच्या माध्यमातून ते प्रकाशन व्यवसायात आहे. पडद्यामागचं गाणं, आशांकित, भारतीय राष्ट्रनिर्मितीची मूलतत्त्वे ही त्यांची प्रकाशनं आहेत. के४६ नावाचं पुस्तक लवकरच येऊ घातलंय. आंबेडकरांच्या संविधान सभेतील भाषणाच्या अभिवाचनाचे प्रयोग ते करतात. कविता, गाणी, कला, क्रीडा यांची केवळ आवड नव्हे तर तसे सुप्तगुण अंगी बाळगून असलेले आणि प्रभावी वक्तृत्व गुण अंगी बाळगणारे राज असरोंडकर हे एक बहुआयामी सामाजिक व्यक्तिमत्व आहेत.

राज असरोंडकर : कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते

Create Account



Log In Your Account