सांस्कृतिक सौहार्दाचं, माणसावर असलेल्या सामजिक दबावाचं, ग्रामीण जीवनाचं आणि मानवी नातेसंबधातील गुंतागुंतीचं मनोज्ञ दर्शन संगीता अरबुने यांच्या ललित लेखसंग्रहातून घडतं, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी केलं. त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होत्या.
वसईतील सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री संगीता अरबुने यांच्या शब्दालयने प्रकाशित केलेल्या 'एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी' या ललित लेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच समाज उन्नती मंडळ, माणिकपूर (वसई ) येथे संपन्न झाला. श्रीकांत बोजेवार यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं.

श्रीकांत बोजेवार म्हणाले की हे लेखन स्मरणरंजन म्हणून केलेलं नाही नाही तर भूतकाळाच विस्मरण होऊ नये म्हणून केलेलं आहे. बालपण ते अडनिड वय असा एक विलक्षण वेगळा प्रवास या पुस्तकात असून श्वासाश्वासातून अथांग होत जाण्याची प्रक्रिया आणि जगण्याचा खूप सारा ऐवज यात ठासून भरला आहे. शिवाय लेखिकेची विनोदबुद्धीदेखील आपलं लक्ष वेधून घेते, अशा शब्दांत बोजेवार यांनी पुस्तकाचं व लेखिका संगीता अरबुने यांचं कौतुक केलं.
प्रमुख पाहुण्या अनुराधा नेरुरकर यांनी, आपल्या जगण्यामधल्या स्थित्यंतराचा परिपक्वतेने घेतलेला धांडोळा म्हणजे हे लेख आहेत, असं मत मांडत, हे पुस्तकं म्हणजे आठवणीच्या पानांचा विडा मुखात ठेऊन पुस्तकाच्या पानांच्या तारा छेडत तल्लीन होऊन अनुभवण्याची मैफिल असल्याचं सांगितले.
या पुस्तकात मानवी स्वभावाचे सर्वच रंग लेखिकेने सामर्थ्याने चितारले असून पुस्तकातले अनुभव जेवढे व्यक्तिगत आहेत, तेवढेच समष्टीला कवेत घेणारे आहेत. यातले बारीकसारीक तपशील ते अनुभव गहिरे करत जातात आणि वाचकाला त्या अनुभवाशी घट्ट जोडून ठेवतात, असं समीक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या पाहुण्या प्रिया धारूरकर यांनी केलं.

या पुस्तकातील लेख जीवनातील विरोधाभासातून फुलले आहेत. यातले अनुभव लेखिकेने तासून घेतले आहेत, त्यामुळे सर्वच लेखांना एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे, असं मत डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडलं.
ज्या विषयाला स्पर्श करायला कोणी धजावणार नाही, अशा विषयावर लेखिकेने अतिशय मोकळेपणाने लिहिल्याबद्दल आणि यातला नितळपणा प्रांजळपणा मनाला कसा भिडत जात असल्याबद्दल तसंच यातली भाषा, लिहिण्याची सहज शैली आणि प्रवाहीपणा याबद्दल सर्वच वक्त्यांनी लेखिकेचं कौतुक केलं आणि पुस्तकाच्या शीर्षकासारखंच हा विडा बहारदार झाल्याचं सांगितलं.

उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक स्नेहा अरबुने यांनी केलं तर सुषमा राऊत आणि शिल्पा परुळेकर पै यांनी सूत्रसंचालन केलं. रवींद्र जाधव यांनी आभार मानले.
कोणाला पुस्तक हवे असल्यास 8080233963 या नंबर वर GPay करून ॲड्रेस पाठवा. पुस्तक घरपोच मिळेल. पुस्तकाची किंमत रु. 300 आहे. पोस्टेज खर्च त्यातच समाविष्ट असेल.