बापरे. प्रेमविवाहात तीन कोटी रुपये खर्च हे ऐकूनच माझे डोळे पांढरे झाले. माहेराहून सासरी जाताना प्रत्येकदा वैष्णवी हगवणेला लाखो रुपये सोबत द्यावे लागत होते. प्रत्येकदा असे होत असताना गेल्या दीड वर्षांमध्ये एकदाही आई-वडिलांचे डोळे का उघडले नाही? सासरी इतका छळ होत असताना मुलीने एकदाही तक्रार का केली नाही? इतकं सहन करणारी मुलगी नऊ महिन्याच्या आपल्या बाळाला सोडून आत्महत्या करूच शकत नाही.
२६ घाव ज्या मुलीच्या शरीरावर आहेत, त्या मुलीचा खून झाला हे सांगण्यासाठी कुठल्याही इन्स्पेक्टरची किंवा भविष्यवेत्याची गरज नाही. सासू, नवरा आणि नणंद या तिघांना अटक झालेली आहे.
सासरा आणि दिरालाही शोधून काढणे हे आता पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे आणि यांच्यापैकी एकालाही जामीन मिळणार नाही याची काळजी समस्त समाजाने घ्यायला पाहिजे. यांच्या बाजूने कोण वकील उभा राहतो त्यावर लक्ष ठेवून असलं पाहिजे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा हा माणूस आहे. जामीन मिळण्यासाठी पोलिसांवर प्रेशर येईल यात शंकाच नाही. आता यावेळी राजकारण्यांच्या प्रेशरपेक्षा सामाजिक प्रेशर जास्त वाढायला हवे.
महिला आयोगाकडून आम्हाला अजिबात अपेक्षा नाही. रूपाली चाकणकर काय करतात हे आपण अनेक केसेस मध्ये आज पर्यंत पाहिलेच आहे.
नेहमीच एखाद्या मुलीने छळाला कंटाळून आत्महत्या केली किंवा तिचा अशा पद्धतीने खून झाला तर सगळे लोक गळा काढून रडत राहतात. खूप गंभीरपणे लेखन करतात. आपले बाईट्स देतात. पण पुन्हा येरे माझ्या मागल्या.
जी मुलगी अडचणीत आहे, जिला सासरी किंवा कुठेही त्रास होत असेल, तिचे शोषण होत असेल, तिच्यावर अत्याचार होत असेल तर त्या मुलीच्या मनामध्ये समाज काय म्हणेल? असा विचार न येता सरळ सरळ घर सोडून जाण्याच धाडस तिच्यात निर्माण होईल, अशी परिस्थिती समाजानं निर्माण करायला पाहिजे. तेव्हाच असे प्रकार बंद होतील.
माहेरचे दरवाजे माझ्यासाठी कधीही उघडे आहेत हा विश्वास प्रत्येक मुलीला असला पाहिजे !
तिसरा मुद्दा आणखी एक महत्त्वाचा आहे की राजकारण्यांजवळ उठसूठ बंदुका येतात कुठून ? या प्रकरणात दोन-तीन वेळा बंदूकधारी बंदूकधारी असा उल्लेख झालेला आहे.

९ महिन्याचं लहान बाळ ज्या निलेश जवळून तिचे वडिल, काका, मामा आणायला गेले होते त्या माणसाच्या हातातसुद्धा बंदूकच होती आणि बंदुकीच्या जोरावर त्या माणसाने यांना पिटाळून लावले होते.
वैष्णवीच्या वडिलांना या घरात लग्न करून द्यायचे नव्हते. पण तिच्या नवऱ्याने बंदुकीच्या धाकावरच वडिलांना लग्नाची परवानगी देण्यास बाध्य केले.
पोलीस आपले काम चोख बजावत नाहीत, कारण त्यांना पॉलिटिकल लोकांकडून प्रेशर असते. पोलिसांनी आपले काम प्रामाणिकपणे बजावले तरच अशा मुलींना न्याय मिळू शकतो.

या प्रकरणात वैष्णवीचे सासू-सासरे दीर नणंद नवरा जेवढे दोषी आहेत तेवढेच त्यांना पळून जाण्यास इनडायरेक्टली मदत करणारे राजकारणी आणि पोलीसही जबाबदार आहेत. या बेजबाबदार पोलिसांवर आणि राजकारण्यांवरही कडक कारवाई करण्यात यावी. नाहीतर अशा वैष्णवी साठी चार दिवस रडारड होईल आणि पाचव्या दिवशी पुन्हा एखाद्या वैष्णवीचा असाच दुर्दैवी शेवट होईल.
समाजाने; पर्यायाने आई-वडिलांनी बदलण्याची गरज आहे आणि सो कॉल्ड प्रतिष्ठा या शब्दाची व्याख्या बदलण्याची गरज आहे. आपल्या मुलीला त्रास होताना दिसला की लग्न टिकवून ठेवण्याचा हट्ट आई-वडिलांनीही ठेवू नये आणि मुलीने तर मुळीच ठेवू नये. टोकाचे सहन करून लग्न टिकवण्याची जबाबदारी केवळ मुलींचीच नाही !
अरुणा सबाने
लेखिका / सामाजिक कार्यकर्ता
arunasabane123@gmail.com / 9970095562