महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांचा लढा हातात घेऊन कायद्याने वागा लोकचळवळीने कामगार क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. उल्हासनगर महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर लढताना मनुष्यबळ पुरवठा कंत्राटांचा भेसूर चेहरा समोर आला. महानगर पालिका प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या संगनमतातून कंत्राटदारांना पाठबळ पुरवलं जातं आणि कामगारांना वाऱ्यावर सोडून दिलं जातं. कामगार हक्कांबाबत सत्ताधाऱ्यांची उदासीनता आणि कंत्राटांतील राज्यकर्त्यांचीच छुपी भागीदारी यांमुळे कामगार हितासाठीचा लढा खडतर होतो खरा ; पण सनदशीर मार्गाने नियमकायद्यांचा आधार घेत चिकाटीने लढलं तर न्याय मिळवता येतो, हे कायद्याने वागा लोकचळवळीने उल्हासनगरात दाखवून दिलंय. आता हा लढा हळुहळू महाराष्ट्रभर पसरतोय.