मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
मी बरेली, बिकानेर आणि कैथल ह्या ठिकाणी पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करत असताना कॅन्सरचे प्रमाण मला खूप वाढलेले दिसले. कैथलमध्ये जवळजवळ 80 टक्के FNAC मध्ये मला कॅन्सर मिळाला. हरियाणा मध्ये दूध, फळे, भाजीपाला इतका चांगला असूनही कॅन्सरचे प्रमाण जास्त का हे मला समजत नव्हते आणि एक दिवस मी पाण्याचे प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण ह्या विषयावर वेबिनार ऐकला आणि मला उत्तर मिळाले.
वेबिनारमध्ये सांगितले की पाण्यातील जीव प्लास्टिक खातात आणि मरतात ! एवढ्यावरच हे थांबत नाही तर त्यांच्या आतडयात ह्या प्लास्टिकचे मायक्रो प्लास्टिक मध्ये रूपांतर होते आणि ते मासे किंवा सी फूड खाल्ल्याने कॅन्सर होतो. तसेच हे जीव जमिनीत मिसळल्याने झाडांत, फळांत भाज्यांतही हे मायक्रो प्लास्टिक जाते.
लगेच माझ्या डोळ्यासमोर बिकानेरमधील उकिरडे आले. गाई, डुकरे, कुत्रे त्यावर चरत असायचे. ओला आणि सुका कचरा अजूनही वेगळा केला जात नाही. केला तरी ओला कचराही प्लास्टिक मध्येच टाकला जातो. हा कचरा सर्रास गाई, कुत्रे, पक्षी खात असतात.
ह्यावर उपाय म्हणून खरे तर प्लास्टिक बंदीच व्हायला हवी. पण ते खूप कठीण आहे. त्यामुळे मला वाटते की ओला कचरा प्लास्टिकमध्ये गुंडाळण्यास तरी बंदी केली पाहिजे. कंपोस्टिंग करणे सक्तीचे केले पाहिजे. खाण्याची वस्तू आणि प्लास्टिक एकमेकांच्या संपर्कात येऊ देता कामा नये.
आपल्याकडे लोक कॅन्सर दुसऱ्या स्टेजला गेल्याशिवाय डॉक्टरांकडे येत नाहीत. कैथलसारख्या ठिकाणी निदान झाले तर उपचारांसाठी दिल्ली किंवा रोहतकला पाठवतात. सध्या हे कोरोना मुळे बंद आहे. हेच चित्र सर्व लहान शहरांत असणार हे नक्की. तेव्हा प्लास्टिक आणि ओला कचरा एकत्र न येऊ देणे खूप गरजेचे आहे.
कैथल, हरयाणा