मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे कळविले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल असे त्यांनी म्हटले आहे.
कोविडसंसर्गाची भीती लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने सत्र परीक्षांच्या गुणांच्या सरासरीच्या आधारे पदवीच्या अंतिम परीक्षांचा निकाल देण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण त्यात आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी खोडा घातला आहे. त्यामुळे आता पदवी परीक्षांच्या निकालावरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्षाची चिन्हे आहेत.
युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे. घाणेरड्या राजकारणासाठी राज्यपाल आठ लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत, असा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.
हे राहणार मस्तपैकी राजभवनात आणि ८ लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी ह्यांच्या घाणेरड्या राजकारणाकरिता खेळणार.?
He lives in full safety in Raj Bhavan but wants to expose 8 lakh students to risk of contracting corona for the sake of dirty politics? https://t.co/Bk19Y36U1J
— Varun Sardesai (@SardesaiVarun) June 2, 2020
नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरुंची विडिओ काॅन्फरन्सिंग द्वारा बैठक पार पडली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय कसा घेता येईल ह्यावर चर्चा झाली आणि लवकरात लवकर कायदेशीर बाबी तपासून निर्णय करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यानी दिले होते. त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी राज्याला केलेल्या संबोधनावेळी दिली होती.
मुख्यमंत्री म्हणाले होते,
मी कुलगुरूंची एक बैठक घेतली. परीक्षा घ्यायची असेल तर तातडीने परीक्षा घेण्याची परिस्थिती नाही आहे, कारण, ते कुलगुरू आणि मी मुख्यमंत्री असलो तरी आमच्यातला पालक आज ही जिवंत आहे. अनेक पालकांची चिंता आहे, कोविड पसरत असताना आमच्या मुलांना आम्ही परीक्षेला पाठवावं का? काही लाख विद्यार्थी परीक्षेसाठी एकत्र येणार, किती अंतर ठेवणार? म्हणून आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे की साधारणतः जेवढे सेमीस्टर झाले आहेत, त्यांची सरासरी काढून त्या विद्यार्थांना मार्क्स द्यायचे आणि त्या विद्यार्थ्यांना तसे पास करायचं, जेणेकरून त्यांचे आयुष्य थांबणार नाही.
पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांनी घेरले असून ते आपल्या शैक्षणिक करिअरबाबत भयभीत आहेत. त्यामुळे मा.कुलपतींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची योग्यवेळी दखल घेऊन त्यांना चिंतामुक्त करावे, अशी मागणी घेऊन भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी आजच राज्यपालांची भेट घेतली होती.
राज्य सरकारने केवळ परीक्षा रद्द करण्याचा व सरासरी गुणाधारित निकाल देण्याचा निर्णय घेतला नव्हता, तर ज्या विद्यार्थ्यांना निकालातील गुण मान्य नसतील, त्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याचाही पर्याय ठेवला होता. पण आता राज्यपालांच्या पवित्र्यामुळे सदरबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
अभाविप ह्या भाजपाच्या विद्यार्थी संघटनेने महाराष्ट्रात परीक्षा व्हाव्यात, म्हणून राज्यपालांकडे मागणी केली होती. आश्चर्य हे की याच संघटनेने गोव्यात अंतिम परीक्षा न घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. शिवाय, तोच लाभ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनाही मिळावा, म्हणून मागणी केली आहे.
News by MediaBharatNews Team