भारतातलं पहिलं गाय मंत्रालय मध्यप्रदेशात बनलं. सहा विभाग या मंत्रालयाला जोडण्यात आलेत गाईच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी ! त्याच मध्यप्रदेशात जवळपास दीडशे जिवंत गाई दरीत ढकलून देण्याची घटना घडलीय ; पण मूठभर मांस सापडलं म्हणून केवळ संशयावरून लोकांचे जीव घेतल्या जाणाऱ्या देशात कुठल्या कोपऱ्यातूनही कोण्या हिंदुत्ववाद्यांचा संताप जाऊद्या, पण साधी हळहळही ऐकू आली नाही !
कारण स्पष्ट आहे. गोहत्येत किंवा गाईच्या छळात हिंदू आरोपी असतील तर तथाकथित गोरक्षकांना वेदना होत नाहीत की त्यांच्या तथाकथित धार्मिक भावनाही दुखावल्या जात नाहीत, हे यापूर्वीही अनेक घटनांत दिसून आलंय. मध्यप्रदेशात तथाकथित गोरक्षकांचं आणि एकूणच हिंदुत्ववाद्यांचं गायप्रेम किती ढोंगी असतं, ते पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.
घटना मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यातली आहे. जवळपास १४० गायी दरीत ढकलल्या गेल्याचं वृत्त आहे. काही गाईंचा मृत्यू ओढवलाय तर मोठ्या संख्येने गाई जखमीही झाल्यात. १ ऑक्टोबरपासून दरीतून गायींची सुटका करण्याचं काम सुरू आहे. पण माध्यमांनी किंवा कोणीही घटना लोकांपर्यंत पोहचू दिली नव्हती.
एकतर राज्य मध्यप्रदेश ! भाजपाशासित !! त्यात आरोपीही हिंदू !!! वातावरण तापवायला, गरळ ओकायला, विद्वेषाचा नंगानाच करायला माध्यमांनाही काही संधी नव्हती. पण दरीतून गाईंची सुटका करतानाचा विडिओ समाजमाध्यमात प्रसारित झाला आणि या घटनेला वाचा फुटलीय. विशेष म्हणजे, घटना घडली तेव्हाच यंत्रणांना कळवलं होतं, पण कोणी लक्ष दिलं नाही, असाही आरोप करणारे लोक संबंधित गावांत आहेत.
कोणी किती धर्मश्रद्धेच्या बाता मारल्या आणि त्यावर धर्मद्वेषी राजकारण केलं तरी गाईचं दूध आटलं की लोकांचं गायप्रेमही आटतं, ही काही नवीन बाब नाही. रेवा जिल्ह्यातील लालगांव आणि सराई रचोई गावातील आपल्या शेतातील पिकांची नासधूस वाचवण्यासाठी भटक्या व भाकड गाईंच्या बाबतीत क्रूर पाऊल उचललं, अशी माहिती पुढे येतेय.
नोव्हेंबर, २०१९ मध्ये डहाणू तालुक्यातील वाणगावमध्ये 30 ते 35 मोकाट गाईंचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. माटगाव गावाच्या परिसरात सदर गाईंचे मृतदेह आढळून आले होते. माटगावच्या आसपास मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व मिरची बागायती आहेत. त्यात भाजीपाल्यासह अन्य पिकांची लागवड केली जाते. रात्रीच्या सुमारास 60 ते 70 मोकाट गाईंचा तांडा कुंपण तोडून किंवा उड्या मारून बागेत घुसतात आणि बागच्या बाग फस्त करून टाकतात. त्यामुळे संबंधित बागायतदारांचे प्रचंड नुकसान होते. यालाच कंटाळून एखाद्या बागायतदाराने भाजीपाल्यांमध्ये थायमेटसारखे जहाल कीटकनाशक वापरून मोकाट गाईंना ठार मारल्याची शक्यता त्यावेळी गावकर्यांकडून व्यक्त केली गेली होती. नोव्हेंबर, २०२० मध्ये राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात एकाच गोशाळेतील ९४ गाईंचा एकाचवेळी मृत्यू झाला होता. छत्तीसगडमध्ये ऑगस्ट, २०१७ मध्ये हरीश वर्मा नावाच्या भाजपा नेत्याच्या गोशाळेत २०० गाईंचा उपासमारीने मृत्यू झाला होता. मार्च, २०१९ मध्ये उत्तरप्रदेशात नोएडायेथील एका गोशाळेतही चारा आणि पाण्याविना तडफडून सुमारे २०० गाईंचा मृत्यू ओढवला होता. अशा कुठल्याच घटनेत तथाकथित गोरक्षकांनी बोंब मारल्याचं किंवा कोण्या हिंदुत्ववादी संघटना, राजकीय पक्षांनी आवाज उठवलेला नाही.
मप्रमधील घटनेत कैलाश यादव, धीरेंद्र सिंग, महेंद्र सिंग, बच्चा साकेत, ब्रिजवासी यादव आणि इतरांविरोधात गढ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. आरोपी फरार आहेत. लालगावांतील संजय शर्मा याने १ ऑक्टोबरला पोलिसांत तक्रार दिली होती. तिथून गाईंचा शोध सुरू आहे. गाईंना दरीत ढकलून देण्याचा प्रकार काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यात अजूनही आरोपी असावेत, असा संशय पोलिस अधिक्षक नवनीत बसीन यांनी व्यक्त केलाय.
जिल्हाधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती नेमलीय. इतक्या मोठ्या संख्येने गावात गाई आल्या कुठून, हाही प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांना भेडसावतो आहे.