मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
लोक पाप दूर करण्यासाठी देवदर्शनाला जातात; पण भारतात इथल्या जातीयवादी विषम समाजव्यवस्थेत खालच्या समजल्या गेलेल्या जातींनी मंदिरात जाणं गुन्हा ठरवला गेलाय. या लोकांनी देवदर्शन करणं हेच हिंदू धर्मात पाप समजलं गेलंय. त्यापायी आजवर कित्येकांचे जीव गेलेत, पण लोकांचीही देवदर्शनाची हौस काही फिटत नाही. उत्तरप्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील डोमखेडा गांवातील अकरावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विकास जाटवने असाच देवावर विश्वास ठेवून मंदिरात अगरबत्ती लावायला गेला आणि जीव गमावून बसला.
एक आठवडापूर्वीच विकास जाटव यांचे काका रुपवर जाटव यांनी हसनपूर पोलिस स्टेशनला एक तक्रार दिली होती. त्यानुसार, रुपवरचा मुलगा दिले सिंग जाटव आणि भावाचा मुलगा विकास हे गावातील मंदिरात अगरबत्ती लावण्यासाठी तसेच दर्शनास गेले असता गावातील चौहान जातीतील लोकांनी चमट्टो, हमारे मंदिर को गंदा करने आते हो, म्हणत त्यांना मारहाण केली होती आणि धमकी दिली होती की पुन्हा मंदिराची पायरी चढाल तर याद राखा.
पण, या तक्रारीचा चौहान मंडळींनी राग धरला व आमच्या विरोधात खालच्या जातीतील लोकांनी तक्रार केलीच कशी ह्या रागात विकास जाटव ह्या १६ वर्षीय मुलाची त्याच्याच घरात घुसून गोळी घालून हत्या केली.
डामखेडा गावात सगळी घरं सवर्ण समाजातील लोकांची आहेत. त्यात आमचं एकच घर जाटव समाजाचं आहे. मंदिरात गेल्याचा राग आणि त्यातून झालेल्या वादाची तक्रार आम्ही पोलिस स्टेशनला दिलेली असल्यामुळे सात जूनच्या मध्यरात्री १२:३० ला गावातील चौहान मंडळी होराम चौहान, लाला चौहान, रोशन चौहान,राजवीर आमच्या घरी आले. माझा मुलगा विकास हा अंगणातील एका बाजेवर झोपलेला होता तर बाजूलाच मी आणि माझे इतर दोन मुलं दिनेश आणि अनिल दुस-या बाजेवर झोपलो होतो. अचानक गोळीचा आवाज झाला आणि आम्ही जागे झालो. वर उल्लेखित चार जणांनी गोळी घालून माझ्या मुलाला मारुन टाकलं होतं आणि आम्हालाही धमकी दिली की आमच्या विरोधात तुम्ही पोलिस स्टेशनला गेलेच कसे? आम्ही बहुसंख्य आहोत. तुम्ही मुठभर लोक गावात आदबीने रहा आणि जगा. जास्त फडफड कराल तर असेच मारले जाल !
गोळीच्या आवाजाने शेजारपाजार जागा झाला तेव्हा चौहान गुंड निघून गेले. जाटव कुटुंबाने विकासला हसनपूरमधील सरकारी हाॅस्पिटलात धावतपळत नेलं, पण डाॅक्टरांनी पाहताच सांगितलं की तो मृत आहे.
वास्तविक, पहिल्याच तक्रारीनंतर पोलिसांनी आपलं कर्तव्य व्यवस्थित बजावलं असतं आणि थोडीसी हालचाल केली असती तर १६ वर्षाचा विकास जिवंत राहिला असता अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागली आहे. आरोपींविरोधात हत्या, धमकी व अनुसूचित जाती जमातींवर अन्याय अत्याचार विरोधी कायद्यातील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अमरोहा चे एसपी विपीन टाडा यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या प्रकरणाच्या पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत.
News by MediaBharatNews Team