मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
मुखवटा उतरवल्यावर बाईपणातून सहज बाहेर पडता येत असावं. हा मुखवटा कुठला असतो तर वेगवेगळ्या नात्यांचा आई, नवरा, सून वगैरे. कपाळावर टिकली लावली जाते ते कपाळ मुखवट्याचं असतं. एकटेपण येतंच ह्या मुखवट्यामुळे. कधी तो एकटेपणा कविता देतो कधी चांदणं.
तुरुतुरु पळणारे उंदीर ही कविता विलक्षण आहे. त्यातला बासरीवाला कोण? तर आपल्याला मिळालेले नेते. प्रजा उंदीर. ह्या प्रजेला एका आमिषाकडे बासरीवाला घेऊन जातोय. शिक्षण व्यवस्थेपासून ते ग्राहकपेठ, वेश्यांच जीवन आणि प्रेम असा खूप मोठा कॅनव्हास असलेली ही कविता आहे.
केंव्हातरी कवीला जाग आलीय की हे जे जगणं आहे त्यातल्या खूपशा गोष्टी अनावश्यक आहेत. ही कविता स्रीवादीच पण तिचा माणूस म्हणून जास्त विचार केला आहे. मला माहीत नाही पण ह्या कवी सामाजिक कार्य करत असाव्यात. सामाजिक प्रश्नांकडे पाहायची त्यांची नजर स्वतंत्र आहे.
माझी कविता मला सुधारायचीय, वाढवायचीय आणि चांगली-वाईट कविता मला कळतेदेखील. तरीही कविता हे माझं पहिलं प्रेम, माझा प्राण वगैरे मी म्हणत नाही. स्त्री मुक्ती संघटनेचं काम हेच माझं पहिलं, दुसरं, तिसरं अशी सगळी प्रेमं आहेत. माझ्या वैयक्तिक झगड्यात या कामाने आणि वैचारिक बैठकीनेच मला बळ दिलं आहे. त्यामुळे मी कितीही कविता केल्या तरी मी आधी कार्यकर्ती आहे आणि नंतर कवी, बँकर, वगैरे वगैरे. आपण जे जगतो, वाचतो, कानांनी टिपतो, नजरेद्वारे मेंदूपर्यंत पोहोचवतो, त्याचा रवंथ करणं आणि त्याचे राजकीय, आर्थिक, सामाजिक संबंध लावणं हे सगळ्याच क्षेत्रातल्या कलाकारांचं काम आहे, तेवढंच मी प्रामाणिकपणे करते. कवितेत ते आपसूक उतरतं. माझी कविता कवितेसारखी नाही, कारण सुरूवातीला मी फारच कमी कवी वाचले होते. साहित्याची अभ्यासक, विद्यार्थी नसल्याने ‘कविता म्हणजे काय?’ हेच मुळात माहित नव्हतं. आपली अस्वस्थता, चीड, संताप बाहेर काढण्यासाठी लिहायला लागले, ती कविता आहे, हे नंतर कळलं.
– योगिनी राऊळ, कवी
एक विदारक सत्य आपल्याला ह्या दोन्ही संग्रहातून दिसतं की कायदा काही करू शकत नाही.प्रत्येक माणसानं त्याच्या त्याच्या आयुष्यात बदल घडवायला हवेत समाजमनाने बाईकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. किंवा आपण तो बदलायला लावला पाहिजे.
एक मला आवडलं की योगिनी कवितेसारखी कविता लिहीत नाही. सजवलेली मेकअप केलेली किंवा अनेक अलंकारांनी सजवलेली कविता लिहीत नाहीत. आज जी कविता आपल्या आजूबाजूस दिसते ती कवितेसारखी लिहिलेली कविता आहे.
हे दोन्ही संग्रह वाचल्यावर मी फ्रेश झालो. कारण ह्या बाईने कवितेतून केलेले हल्ले मी परतवण्याच्या मन:स्थितीत राहूच शकलो नाही. कवितेनं मला तिच्या कह्यात पहिल्या कवितेपासूनच घेतले होते.
रवीन्द्र दामोदर लाखे
लेखक कवी / नाट्यदिग्दर्शक आहेत.
Vrushali vinayak
ज्येष्ठ दिग्दर्शक रवीन्द्र लाखे यांनी योगिनी राऊळ यांचा ‘कवी’असा उल्लेख केलाय. हे लक्षणीय आहे. योगिनी यांच्या कविता नेहमीच वेगळा आशय घेऊन अवतरतात.
बाईपण/पुरूषपण याहीपलिकडे आता ‘माणूस’पणाची साद हवी.
मागे एकदा दिशा पिंकी शेख यांच्याशी गप्पांत तिने एक प्रश्न मला सहज विचारला होता, आम्ही तृतीयपंथी तर मग पहिला, दुसरा कोण ? हे कुणी ठरवलं ? मी निरूत्तर होते.
स्त्रीवाद अभ्यासताना असे बरेच मुद्दे चर्चेत येतात.
आज योगिनी राऊळ यांच्या कवितासंग्रहावरचे परीक्षण वाचताना ही आवडलेली बाब आहे.
– वृषाली विनायक, कवी