पंधरा जून ! शंकर वैद्य सरांचा वाढदिवस. सरोजिनी बाईंचाही वाढदिवस असतो. कुसुमावती देशपांडे आणि कवी अनिल यांच्या नंतर सरोजिनी बाई आणि शंकर वैद्य हे साहित्यातील अभ्यासू जोडपं होतं. दरवर्षी त्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटणं होत असे.
सरांना नारळाच्या वड्या आवडत असत. जायच्या आधीच्या १५ जूनला त्यांच्या घरी झालेली शेवटची भेट आजही अस्वस्थ करते.
दरवाजा उघडायला लागलेला वेळ.. खालावलेली शरीरयष्टी.. ढळलेले संतुलन.. मराठीतला एकेकाळच्या राजबिंड्या कवीची, मराठीतल्या कविता खडानखडा तोंडपाठ असलेल्या कवीची अवस्था अस्वस्थ करून गेली.
कळकट कपड्यात आजवर सरांना कधीच पाहिलं नव्हतं, घरात एकटे, समोरच्या गाडीवर वडापाव खाल्ला म्हटल्यावर गलबलून आलं. फोनवर सांगायचे बहीण डबा पाठवते, कधी विद्यार्थिनी.. खोटं होतं का ते की आपलंच समाधान?
अलीकडे रजनी परुळेकर विपन्नावस्थेत गेल्या.. का होतं असं? एकमेकांना सावरायला, आधार द्यायला कमी पडतो आहोत का? की असंवेदशील झालो आहोत? उपयोग संपला की फेकून देणारे?

सतत आजूबाजूला असणारे, त्यांच्या बरोबरच अस्तित्व, ओळख, मैत्री अभिमानाने मिरवणारे मित्र मैत्रिणी, कवी लेखक सहकारी कुठे असतात अशा वेळी?
त्या पंधरा जूनला त्यांनी 'दर्शन'नंतरच्या कवितांचं तिसरं प्रुफ दाखवलं. ते बाड रामदास भटकळ यांच्याकडे आहे असं म्हणतात..
आज सरांना 'हॅपी बर्थ डे' म्हणताना त्यांच्या अप्रकाशित कविता लवकर येवो, तीच त्यांना वाढदिवसाची भेट असू शकते..
राजीव जोशी
ज्येष्ठ कवी