मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट चित्तारणारं खास मुलांसाठी लिहिलेल्या ” ज्ञानाई सावित्रीबाई फुले ” या पुस्तकाचं प्रकाशन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते नायगाव येथील सावित्रीबाईं स्मारकावर करण्यात आलं.
वर्षा गायकवाड यांनी “ज्ञानाई सावित्रीबाई फुले ” पुस्तक कुमारवयीन वाचक तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचं सांगितलं. देशातील पहिल्या शिक्षिकेचं एका शिक्षिकेने अत्यंत ओघवतं चित्रमय चरित्र प्रकाशित करून अनोखी आदरांजली अर्पण केली आहे, अशा शब्दात शिक्षण मंत्र्यांनी पुस्तकाच्या लेखिका राखी रासकर यांचा गौरव केला .
सावित्रीमाईंच्या त्यागामुळेच आज मला शिक्षण मंत्री पदावर विराजमान होता आलं, त्याचा अभिमान आणि गर्व असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. ती होती म्हणून मी आहे, आम्ही सर्व महिला प्रगती करू शकलो, याचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
राखी रासकर ह्या पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षिका आहेत. त्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मानकरी आहेत. ज्ञानाई हे त्यांचं सातवं पुस्तक आहे.
आपल्या समाजसुधारकांचा इतिहास शालेय मुलांपर्यंत पोहचावा, तोही सहजसुलभ भाषेत, हा पुस्तकामागचा उद्देश्य असल्याचं राखी रासकर यांनी मिडिया भारतला सांगितलं.
पुस्तक चित्रमय आहे, शिवाय त्यात मुलांसाठी प्रश्नावलीसुद्धा दिलीय, जेणेकरून पुस्तकातून मुलांचं अध्ययन होईल, असं रासकर म्हणाल्या.
या पुस्तक प्रकाशनावेळी समता परिषदेच्या मंजिरीताई धाडगे , वैशाली नेवसे , चंदाताई केदारी , स्नेहल बाळसराफ , दत्तात्रय बाळसराफ , कविता मेहेत्रे , रघुनाथ ढोक , आशा ढोक हे मान्यवर उपस्थित होते.