मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
कोकणातील देवरूख येथील स्नेह परिवारतर्फे ग्राहक पेठेत कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, असं कानावर आलं होतं. पण जेव्हा मला समजले की ग्राहक पेठ कोकणात आहे, तेव्हा मनात शंका सुरू झाल्या की घरापासून एवढ्या दूर जाऊन आपला स्टॉल लावायचा आणि आपल्या प्रॉडक्टला तिकडे कसा प्रतिसाद मिळेल वगैरे ! अनेक प्रश्न माझ्या मनात येऊ लागले !
आधी मी होकार दिला आणि नंतर पुन्हा विचार आला की तिकडे जाऊन जर आपला सेल झाला नाही तर आपली मेहनत वाया जाईल ! म्हणून मी माझा निर्णय बदलला.
याबाबत माझे कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांच्याशी बोलणे झाले तेव्हा त्यांनी मला ग्राहक पेठेत सहभागी होण्याचे सकारात्मक संकेत दिले. त्याने माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्या आत्मविश्वासासोबतच मी कोकणात जाण्याचा माझा निर्णय होकारात बदलला आणि जोमाने कामाला सुरुवात केली.
प्रोडक्ट जास्तीत जास्त शीर्षक कसे दिसतील, यावर मी जास्त भर दिला. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे, डिझाईन आणि चवीचे चॉकलेट बनवले.
कोकणात गेल्यावर आमची राहण्याची सोय सुजाता माळी यांच्या घरी करण्यात आली. तिकडे गेल्यावर आम्हाला सुजाता माळी यांच्या रूपात आत्या भेटल्या. सगळे घरच्यासारखे वातावरण !
आत्याची मुलगी सायली ही आमची छान मैत्रीण झाली. आमचे चार दिवस कधी संपले, हे आम्हाला समजलेच नाही. त्या चार दिवसात आमची खूप लोकांची ओळख झाली. काही चांगले काही वाईट अनुभव देखील आले ; पण सगळीच माणसे स्वभावाने चांगली होती, आपुलकीने वागली.
ज्या गोष्टीची नाहक साशंकता होती, ती तिथे गेल्यानंतर सपशेल फेल ठरली ! चॉकलेट्स विकले गेले. लोकांनी कौतुकही केले. स्टॉलच्या झालेल्या स्पर्धेत माझा दुसरा क्रमांक आला ; त्यामुळे माझा आनंद आणि आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे.
मला यामध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल स्नेह परिवारचे, रुबीना चव्हाण, राज सरांचे मी मनापासून आभार मानते.
यम्मी चाॅकलेटस्, कल्याण