मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
१६ वर्षीय किशोर युवतीचं तिच्या राहत्या घरातून कुटुंबियांच्या डोळ्यासमोर अपहरण केलं जातं, अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला जातो. तिचे हातपाय तोडले जातात. तिच्या योनीसहित शरीरावर अनेक ठिकाणी लोखंडी सळीने घाव केले जातात. एका हसत्या खेळत्या मुलीचं आयुष्य संपूर्ण उद्ध्वस्त केलं जातं. प्रभु रामचंद्राची जन्मभूमी असलेल्या उत्तरप्रदेशातील ही घटना. अशीच घटना १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत घडली होती, तेव्हा देश पेटला होता. आता मोदीपर्वात आरोपी हिंदू असतील तर मुस्लिमांना तथाकथित संताप येतो आणि मुस्लिम आरोपी असतील तर हिंदूंना चेव चढतो. तोही, राजकीय पक्षांच्या अफवासेलमधून कृत्रिम संताप पेरला तरच. पीडीत आणि आरोपी एकाच धर्माचे असतील तर मात्र प्रसारमाध्यमंही टीआरपीच्या अभावामुळे ते प्रकरण फारसं तापवत नाहीत. अजय मोहन बिष्ट नावाचा तथाकथित सक्षम मुख्यमंत्री असलेल्या उत्तरप्रदेशातील ताज्या घटनेत म्हणूनच देशाची थंड प्रतिक्रिया आहे. त्याचाच फायदा घेऊन पीडितेच्याच कुटुंबाला गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न युपी पोलिसांनी चालवला आहे. बाराबंकीचं प्रकरणही उन्नावच्या दिशेने जात आहे. युपीतील बलात्काराच्या घटना, भाजपाचं आतल्या गाठीचं बेटी बचाव धोरण व सरकारची मानसिकता यांचा आढावा घेणारा राज असरोंडकर यांचा विशेष लेख.
दिपक सैनी, दिपक सिंग आणि राजन सिंग हे उत्तरप्रदेशातील बाराबंकी भागातील एका गावातले दबंग आहेत. जिथे कायद्याचं राज्य नसतं, तिथे अशा दबंगांची पैदास होते. गावातीलच एका मुलीचं या गावगुंडांनी अपहरण केलं. कुटुंबियांच्या डोळ्यांदेखत ही घटना घडली. आरडाओरडा झाला, पण आजुबाजूचे ग्रामस्थ जमेपर्यंत गुंड मुलीला घेऊन फरार झाले होते. गावापासून दूर एका कब्रस्तानच्या ठिकाणी मुलीवर बलात्कार झाला. अपहरणानंतर टिकैतनगर पोलिस ठाण्यात तक्रार करायला गेलेल्या मुलीच्या पालकांना घरी परतताना भेल्सर मार्गावर मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत एका नाल्याच्या बाजूला पडलेली आढळली. तिच्या योनीमार्गात व शरीरावर अनेक ठिकाणी लोखंडी सळीने घाव केलेले आढळले. मुलीचे निर्दयतेने हात पाय तोडण्यात आलेले होते.
संबंधित बातमी :
इस अमानवीय घटना ने हम सबको झकझोर कर रख दिया है। उत्तर प्रदेश सरकार महिलाओं के खिलाफ अपराध रोकने में पूरी तरह नाकाम है। कब तक चलेगा ऐसे?
– प्रियांका गांधी यांचं ट्विट
मुलीच्या अपहरणासंदर्भात टिकैतनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३६५, ३६६ व ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. मुलीचे शव मिळाल्यानंतर त्यात ३०२ कलम जोडण्यात आले. मृतदेहाच्या शवविच्छेदनात बलात्कार झाल्याचं मात्र आढळून आलं नाही, अशी माहिती बाराबंकी पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, एका आरोपीला अटक करण्यात आलीय व लवकरच या प्रकरणाचा उलगडा करू, असं पोलिसांनी म्हटलंय.
आरोपी भाजपाशी संबंधित आहेत आणि त्यांना वाचवण्याचा व पीडितेच्या परिवारालाच गोवण्याचा युपी सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे, असा आरोप सपा आमदार राजेश यादव यांनी केलाय.
मध्यंतरी, एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात भारताला स्त्रीयांसाठी असुरक्षित देश असल्याचं म्हणण्यात आलं होतं. पण देशांतर्गत विचार केला तर आता उत्तरप्रदेशाची प्रतिमा याबाबतीत काळी आहे.
२२ एप्रिल, २०१८ च्या उत्तरप्रदेशातील इंडिया टुडेच्या वृत्तांकनानुसार, जानेवारी ते मार्च या ९० दिवसांत बलात्काराचे १२९ गुन्हे दाखल झालेत. अलिगढ, आग्रा, मथुरा ही तीन ठिकाणं स्त्रीयांसाठी अत्यंत धोकादायक मानली जातात. ७८ गुन्हे या बृजभूमी समजल्या जाणाऱ्या भागातील आहेत.
इंडिया टुडेतील सविस्तर बातमी इथे वाचा :
इंडिया टुडे च्या बातमीत एप्रिल, २०१८ मधली आकडेवारी नसली तरी, त्या महिन्यात बलात्कार व हत्येसंदर्भातील दोन गुन्ह्यांची माहिती माध्यमांतून पुढे आली आहे. या वर्षीही एप्रिल, २०१९ मध्ये मुझफ्फरनगरमधील न्यू मंडी इलाक्यात २२-२३ वर्षाच्या दोन युवतींना बंधक बनवून बलात्कार केल्याच्या व त्यांचे विडियो बनवून ब्लॅकमेलिंगद्वारे अन्य व्यक्तिंमार्फत बलात्कार झाल्याची घटना पंजाब केसरीत वाचायला मिळते. आरोपी संजय लोहानला याकामी विडियो बनवण्यासाठीची मदत त्याची पत्नी रीटा लोहान हिने केल्याचं बातमीत म्हटलंय.
मुझफ्फरनगरच्या घटनेआधी मार्च महिन्यात गाजीपूरमध्ये गावातील घरात एका खोलीत एकट्या झोपलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीवर शेजारी राहणा-या मेहंदी खानने बलात्कार केला व नंतर तिच्यावर घासलेट टाकून तिला पेटवून दिले. लाईव्ह हिंदुस्थानमध्ये यासंदर्भात वृत्त आलं आहे.
बोलता हिंदुस्थानमध्ये ,१३ जून, २०१९ रोजी आलेल्या वृत्तानुसार, लखनौमधील मडियांव भागात राहणा-या पेशाने वकील असलेल्या धर्मेंद्र कुमार सिंह सोमवंशी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. ही मुलगी त्याची भाची आहे व उन्हाळ्याच्या सुट्टीत राहायला आली होती. सतत तीन दिवसाच्या छळानंतर मुलीने आपल्या घरी फोन करून घेऊन जायला सांगितले, तेव्हा हा प्रकार उघड झाला./
https://boltahindustan.in/all-news/rss-worker-and-lawyer-raped-his-own-relative
युपी मुख्यमंत्र्यांच्या गोरखपूर मंडलातील कुशीनगरमध्ये दोन कुटुंबात नाली बनवण्यावरून वाद झाला, तो मारामारीपर्यंत गेला. त्यांचं विद्वेषात एका बारा वर्षांच्या मुलीवर सहा जणांनी बलात्कार केला. अहिरौली बाजार पोलिस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल झालाय.
सहारनपूर जिल्ह्यात नानौता क्षेत्रातील बुंदूगढ गावात आपल्या नातेवाईकांकडे आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी २९ जून, २०१९ च्या नवभारत टाईम्समध्ये वाचायला मिळते.
उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील कोतवाली सादाबाद पोलिस ठाण्यात गाझियाबाद वाहतूक पोलिसांतील एका शिपायावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. ज्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे, तीसुध्दा पोलिस हवालदाराचीच मुलगी आहे. मुलीला घरी बोलावून नशीले पेय पाजून गुंगीत बलात्कार केल्याचा पोलिसावर आरोप आहे. ३ आॅगस्ट २०१९ रोजीची आजतकवरची ही बातमी आहे.
उत्तरप्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून एक सहा वर्षांची मुलगी ७ में २०१९ पासून बेपत्ता होती. जवळजवळ दोन महिने ती सापडून आली नव्हती. नंतर तीचं शव एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलं. पोलिसांनी या प्रकरणात नाज़िल नावाच्या आरोपीला अटक केली. बलात्काऱ्याला बघताच एसपी अजय पाल शर्मा यांनी संतापाने त्याच्यावर गोळी झाडली, अशा आशयाची एक पोस्ट समाजमाध्यमात व्हायरल झाली. योगीच्या राज्यात आता बलात्काऱ्यांची खैर नाही, सरळ गोळी घालणार, अशा आशयाच्या पोस्ट पसरवून त्याचं राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. बलात्कारी आरोपींना गोळीच घातली पाहिजे, भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे, इत्यादी आवेशपूर्ण भावना लोकांनी त्या पोस्टवर व्यक्त केलेल्या होत्या. यात भाजपाची पाठराखण करणारी मंडळी मोठ्या संख्येने होती, कारण उन्नाव प्रकरणात कुलदीप सेंगर हा भाजपाचाच आमदार अडकलेला असल्याने युपी मुख्यमंत्र्यांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागलेला होता. सरकारची डागाळलेली छबी सुधारायची होती, पण प्रत्यक्षात एसपी अजय पाल शर्मा यांनी गोळी झाडलेलीच नव्हती. पोस्टमध्ये रंगवण्यात आलेला प्रसंग घडलेलाच नव्हता. नाज़िलसोबत चकमक झाली तेव्हा एसपी घटनास्थळीही नव्हते.
संबंधित बातमी :
https://www.bbc.com/hindi/india-48752975
बलात्काराच्या गुन्ह्यांबाबत युपी मुख्यमंत्री आणि सरकारचं धोरण काय आहे, हे देशाने उन्नाव प्रकरणात पाहिलंय. पीडितेच्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलं, कोठडीत मृत्यू होईस्तोवर बेदम मारहाण करण्यात आली, पीडितेच्या काकाला एका गुन्ह्यात गुंतवून जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोचवण्यात आलं, पीडीतेच्या गाडीचा अपघात झाला, त्यात तिची काकी, मावशी ठार झाली. पीडिता स्वत: आणि तिची वकील हाॅस्पिटलात मृत्यूशी झुंज देताहेत. त्यांचा आतल्या आत कधीही मृत्यू घडवून आणला जाऊ शकतो किंवा झालाही असेल. अनेक दिवस उपचाराखाली दाखवल्यावर तो मृत्यू नैसर्गिक भासू शकतो. कुलदीप सेंगरवर अनेकानेक गुन्हे दाखल करून युपी मुख्यमंत्री काॅलर कडक करतील, पण प्रत्यक्षात लढायला पीडितेच्या कुटुंबातला कोणी उरलंच नाही, तर बाजू मांडणार कोण? भाजपाचा खासदार बलात्कारातील आरोपीला जेलमध्ये भेटायला जातो आणि मुख्यमंत्र्यांपासून प्रधानमंत्र्यांपर्यंत सगळे सोयिस्कर मौन पाळतात, ही बाब कुलदीप सेंगरचं पुढे काय होणार याचे स्पष्ट संकेत देते. बाराबंकी प्रकरणसुध्दा उन्नावच्याच दिशेने चाललंय. पोस्टमार्टममधून बलात्कार गायब झालाय, पोलिसांनी पीडितेच्या परिवारावर दबाव आणून घाईने प्रेताची वासलात लावलीय, पीडितेच्या बापालाच गोवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
गुन्हेगार कोणत्याही गुन्ह्यांशी संबंधित असोत, ते भ्रष्टाचारात गुंतलेले असोत वा बलात्कारात वा देशविरोधी कटकारस्थानात, ते जर भाजपाशी संबंधित असतील किंवा भाजपात येणार असतील, तर भाजपा त्यांना संरक्षण देते, हे नव्या भारताची धोरण आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. पण लोक हिंदू-मुस्लिम द्वेष, काश्मीर, पाकिस्तानकडे डोळे लावून आहेत. बुडाखाली आग लागलीय, यांचा थांगपत्ताच नाही कुणाला !!! लोकांच्या मेंदूवर भलतंच नियंत्रण आहे. ते विद्वेषाला खतपाणी घालणारे आहे. त्यातून असिफासारख्या लहान मुलीवरच्या बलात्काराचंही समर्थन केलं जातं, आरोपींच्या बचावार्थ मोर्चे काढले जातात. बलात्कारासारख्या गुन्ह्याबाबतही हा देश संवेदनाहीन झाला आहे. अशा घटनांत आता लोकांचा तथाकथित संताप आपापल्या जातधर्मापुरता मर्यादित, तात्कालिक आणि ढोंगी ठरतो आहे.
——-राज असरोंडकर——-
raj.asrondkar@gmail.com