मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
सायबर गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत. पोलिसांकडून सी आर पी सी कलम १४९ अन्वये अशा समाजकंटकांना आता नोटिसा बजावण्याची मोहिम आता हाती घेतली जाणार आहे. स्त्रीद्वेषी व सामाजिक तेढ निर्माण करणारी सामग्री व मजकूर आपल्या प्लॅटफॉर्मवरून त्वरित काढून टाकावी व अशा समाजकंटक व्यक्तींवर कायमची बंदी घालावी, अशी ताकीदही गृहमंत्र्यांनी टिकटॉक, फेसबूक, ट्विटर व अन्य सामाजिक माध्यम भारतात चालवणार्या कंपन्यांना दिली आहे. “या कंपन्यांच्या भारतीय प्रतिनिधींशी ही गरज भासल्यास याबद्दल चर्चा केली जाईल,” असं त्यांनी सांगितलं.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून लॉकडाऊन व कोरोना महामारी च्या संदर्भात विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे.
महाराष्ट्र सायबर पोलिसांना ट्वीट करण्यासाठी इथे क्लिक करा.
सदर गुन्हे हे मुख्यतः टिकटॉक व्हिडिओ बनवणे, सोशल मीडियावर वेगवेगळी भडकाऊ पोस्ट टाकणे, कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देणाऱ्या पोस्ट टाकणे, कोरोना महामारी बद्दल चुकीची माहिती देणे, कोरोनाग्रस्तांची नावे जाहीर करणे, विविध राजकीय नेत्यांची बदनामी करणारे खोटे पोस्टर्स/ फोटोज टाकणे, त्यांच्यावर हीन दर्जाची व व वैयक्तिक टीका करणे, सर्वसाधारण नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणे इत्यादी गुन्ह्यांचा समावेश आहे.
त्याबाबत भारतीय दंड संहिता १८६०, माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ व व अन्य कायद्याद्वारे सदर व्यक्ती विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातात.
“सावित्रीबाई फुले यांचा वारसा जोपासणाऱ्या या महाराष्ट्रात कोणत्याही स्त्रीला असुरक्षित नकारात्मक वाटता कामा नये, “स्त्री सुरक्षितता गृह मंत्रालयाची एक प्रमुख प्राथमिकता आहे,”
– गृहमंत्री अनिल देशमुख
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४०० गुन्ह्यांची (ज्यापैकी १८ एन.सी आहेत) नोंद १९ मे २०२० पर्यंत झाली आहे. आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १७० गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी १५८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत. अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप, युट्युब) गैरवापर केल्याप्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आत्तापर्यंत २१३ आरोपींना अटक केली आहे यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट उतरवण्यात पोलिसांना यश आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. “महाराष्ट्र सायबर अशा गुन्हेगार व समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासनाला बरोबर समन्वय साधून काम करीत आहे. ते याकरिता टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सामाजिक माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे,” असा इशारा देऊन, लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबरने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाबासकीही गृहमंत्र्यांनी दिली.
सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी इथे क्लिक करा.
लेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे महाराष्ट्र राज्य संघटक आहेत.