मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
जुन महिन्याच्या सुरुवातीलाच कोकण व महाराष्ट्राच्या काही भागाला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. यात रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. वीज यंत्रणा तर पार कोलमडली. इतकी की महिना होत आला तरी लोक अजूनही अंधारातच आहेत.
रायगड जिल्ह्यात वादळामुळे विजेचे खांब अनेक ठिकाणी पडले. सुरुवातीला प्रशासनाच्या माहितीनुसार हे सर्व १५- २० दिवसांत पूर्ववत होणे अपेक्षित होते ; त्यानुसार श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव शहर तसेच जिल्ह्याच्या काही भागात झालेही, परंतु या तालुक्यांच्या ग्रामीण भागात अजूनही वीज पुरवठा खंडित आहे.
वीजेअभावी पाणीपुरवठा होत नाहीय. नागरिक त्रस्त आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील जसवली, रानवली, सायगाव, कळींजे, मारल यांसारखी गावे तर म्हसळा येथील वरवाटणे, साक्लप, तोंडसुरी अशी काही गावेसुद्धा वीजेच्या प्रतिक्षेत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्याचा दौरा करून तातडीची मदत घोषित केली होती, परंतु अजूनही अनेकाना मदत उपलब्ध झालेली नाही. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
यावर नागरिकांनी स्वखर्चाने जनरेटर वाहन जास्तीची रक्कम देऊन भाड्याने मागवण्यास सुरुवात केली ; पण सर्वांनाच ते शक्य होत नाहीये. ज्यांच्याकडे जनरेटर येते, ते मोबाईल चार्जिंग करून देण्याचे पैसे घेतात. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
शासनाने लवकरात लवकर उपाययोजना करून मदत करावी तसेच वीज व पाणी पुरवठा यावर लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, प्रतीक तांबे व शालिनी आचार्य यांनी “मीडिया भारत” शी बोलताना केली आहे.
News by Rakesh Padmakar Meena