केरळातील कासारगोड जिल्ह्यातील खानसा महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नुकतंच एक आंदोलन केलं. खाजगी बसेस त्यांच्या महाविद्यालयाच्या बसथांब्यावर थांबत नव्हत्या. हा बसथांबा विद्यार्थिनींनी प्रचंड पाठपुरावा करून मिळवला होता ; परंतु विद्यार्थिनींना शुल्कात सवलत द्यावी लागेल, या कारणाने खाजगी बसेसचे चालकवाहक महाविद्यालयाचा थांबा घेत नव्हते. शेवटी नाईलाजाने विद्यार्थिनी आंदोलनाच्या पवित्र्यात आल्या आणि त्यांनी रस्त्यांवर निदर्शनं करत बसेस अडवल्या.
काही आंदोलक विद्यार्थिनी बसमध्येही चढल्या. त्या बसमधील एका महिलेचा आणि ह्या विद्यार्थिनींचा वाद झाला. बस अडवल्यामुळे विलंब होतोय, हे वादाचं कारण होतं. व्हिडिओत दिसणारी महिला हिंदू होती आणि आंदोलक विद्यार्थिनी मुस्लिम होत्या.
बुरखा घातलेल्या कोणीतरी महिला एका हिंदू महिलेशी वाद घालताहेत आणि तोही तिथल्या स्थानिक भाषेत ही हा देश पेटवू पाहणाऱ्यांना एक चांगली पर्वणीच होती ; कारण देशातल्या इतर भागात ती भाषा कळणार नव्हती, त्यामुळे मनमानेल ते पसरवता येणं शक्य होतं. शिवाय बुद्धीबधीर आणि विद्वेषी मेंदुंनी विवेक गमावलेला असतो आणि विद्धेषानेच ते मेंदू सुखावले जात असतात.
व्हिडिओ दुष्ट हेतूने देशभर पसरवला गेला. सोबत लिहिलं गेलं की बुरखाधारी मुस्लिम महिला हिंदू महिलेला बुरखा घालण्याची जबरदस्ती करीत आहेत आणि ती त्याला विरोध करते म्हणून त्या महिलेला शिवीगाळ केली जात आहे. भारतामध्ये हळूहळू शरिया कायदा लागू होणार आहे. ही केरळातली परिस्थिती आहे. पुढे भारतभर काय होणार विचार करा ! हिंदूंनो जागे व्हा, अशा आशयाचा मजकूर व्हिडिओसोबत देऊन देश विरोधी शक्तींनी दोन धर्मात आग लावण्याचा, देशातलं वातावरण बिघडवण्याचा आणि त्यासोबतच आपला हलकट राजकीय अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला.
भाजपाचा राष्ट्रीय पदाधिकारी अनिल ॲन्टोनीनेसुद्धा यावर खोटं पसरवणारं ट्वीट केलं व अंगलट आल्यावर काढून टाकलं.

वास्तविक, प्रसारित केल्या जात असलेल्या व्हिडिओसोबत आणखीही काही व्हिडिओ आहेत, ज्यात रस्त्यावर विद्यार्थिनी बसेस अडवताना दिसतात. विडिओत बसस्टॉपही दिसतो. विद्यार्थिनी चालकासोबत वाद घालतानाही दिसतात.

खरंतर विद्यार्थिनींची बसची समस्या होती, परंतु विद्यार्थिनी मुस्लिम असल्यामुळे त्यांची समस्या हलकटपणाच्या दिशेला वळवण्यात आली आणि मेंदूत दिवसरात्र विद्वेषाचे किडे सतत वळवळत असलेल्या लोकांनी खोटं पसरवण्याला हातभार लावला.
या देशाचं संघभाजपाच्या राजवटीत पुढे काय होईल, हे आत्ताच नीट सांगता येत नसलं तरी २०१४ पासून गेल्या १० वर्षात खोटं पसरवल्यानंतर वारंवार तोंडावर आपटल्यानंतरही नवनवीन खोटं पसरवण्याचा निर्लज्जपणा ही मंडळी काही सोडायला तयार नाहीत आणि २०२४ ची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून हा निर्लज्जपणा पुढेही सुरूच ठेवतील, हे केरळातल्या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
राज असरोंडकर
संपादक, मीडिया भारत न्यूज | संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ
mediabharatnews@gmail.com