मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
भारतीय संविधानात मोफत शिक्षणाची स्पष्ट तरतूद असताना कशा प्रकारचा शिक्षण हक्क कायदा देशात लागू असताना पालकांना आजही मुलांच्या शिक्षणावर दरवर्षी पदरचे पाच पंचवीस हजार खर्च करावे लागत असतील तर मोफत शिक्षण म्हणजे तरी काय हा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावून विचारण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी उल्हासनगरातील एका कार्यक्रमात केलं. अशोका फाउंडेशन या संस्थेने असरोंडकर यांना यंदाच्या शैक्षणिक क्षेत्रातील अशोका पुरस्काराने सन्मानित केले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार ज्योती कालानी यांच्या हस्ते असरोंडकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढील काळात शिक्षणावर लक्ष केंद्रित करू, असं यावेळी कालानी म्हणाल्या.
नगरसेविका सविता तोरणे आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांच्या पुढाकाराने अशोका फाउंडेशनचा शैक्षणिक गुणगौरव सोहळा उल्हासनगरातील धरमदास दरबार धर्मशाळेच्या टेरेस हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी आमदार ज्योती कालानी, उद्योगपती सुमित चक्रवर्ती, महादेव सोनवणे, के पी सोमकुंवर, फिरोज खान, शालिनी गायकवाड, मोनू सिद्धीकी, वाय डी शिंदे, एस जी उगले, प्रविण वासनिक, असे अनेक मान्यवर उपस्थित होते. अशोका फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात दरवर्षी दोन व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबाबत सन्मानित करत असते. यंदा राज असरोंडकर यांच्यासोबत मनसेचे विद्यार्थी नेते मनोज शेलार यांनाही अशोका पुरस्काराने गौरवण्यात आले. अभ्यास आणि मेहनतीला पर्याय नाही, असा संदेश मनोज शेलार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करताना राज असरोंडकर यांनी सभोवतालची समाजव्यवस्था, भेदभाव, सामाजिक उदासीनता, लोकप्रतिनिधींची बेफिकिरी आणि सरकारचं एकूणच शिक्षणावर दुर्लक्ष याचा खरपूस समाचार घेतला. उल्हासनगर महानगरपालिकेचं शिक्षणावर अजिबात लक्ष नसून शिक्षण विभागातून केवळ आर्थिक उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप असरोंडकर यांनी केला. शाळेची नवी इमारत उभी असताना देखील मुलांना गळक्या वास्तूत ओल्या जमिनीवर बसण्याची पाळी येते, याबद्दल खेद व्यक्त करून असरोंडकर यांनी आमदार ज्योती कलानी यांच्यासहित मंचावरील सर्व उपस्थितांना आवाहन केलं की आपल्या शहरातील एकही मूल हे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशाप्रकारे काम करण्याचा आपण सर्वजण निर्धार करूया.
त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार ज्योती कालानी यांनी पुढील काळात शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा मनोदय व्यक्त केला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत पुस्तकांसाठी आपण पाच लाख रूपयांचा निधी दिल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण नेहमीच तळागाळातील लोकांसाठीच कार्यरत राहिल्याचं सांगून उल्हासनगरात बचत गटांची चळवळ उभी करण्यात राज असरोंडकर यांचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं कालानी यांनी आवर्जून सांगितलं.
अत्यंत नियोजनपूर्वक नीटनेटकेपणाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ८० होऊन अधिक विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. हे विद्यार्थी बहुतकरून आर्थिक दुर्बल घटकातील तसेच मागास व अल्पसंख्यांक समाजातील होते. अशोका फाउंडेशन वर्षभर या मुलांना अभ्यासातलं मार्गदर्शन करते, त्यामुळे त्यांना गौरवताना आम्हाला एक वेगळाच आनंद मिळतो, असं मनोगत शिवाजी रगडे यांनी कार्यक्रमात व्यक्त केलं. अध्यक्ष सुनील खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास ढोके आणि विद्या कुठे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.