मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
मुंबई शहराची लाईफलाइन असलेली लोकल ट्रेन बंद आहे. हजारोच्या संख्येने होणारी यातायात पूर्णतः ठप्प आहे; त्यामुळे मुंबईतल्या सुमारे ३५००० बुट पॉलीश कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोकल सुरु होईल या आशेने काहीजण स्टेशनांवर येतात खरे, पण पोलिसांचा त्रास आहे.
कोरोनासंसर्गामुळे संपूर्ण देश टाळेबंदीमुळे ठप्प आहे. ह्या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका हा गरीब, कष्टकरी, मजूर, कामगारांना बसला आहे. रोज काम करून रोज कमवणाऱ्यांसाठी ही टाळेबंदी कोरोना आजारापेक्षाही अधिक त्रासदायक आहे. बूटपाॅलिशवाल्यांचा आपले आणि आपल्या परिवाराचं पोट भरण्यासाठीचा संपूर्ण धंदाच जवळपास ४ महिन्यापासून ठप्प आहे.
एका मुंबई शहरात साधारणपणे ३५००० हजार बुट पॉलिश कामगार आहेत. संपूर्ण देशातला आकडा काढला तर तो लाखोंच्या घरात जाणारा आहे. शासन प्रशासनाच्या दरबारी कुठलीही अधिकृत नोंद नसणारा हा कामगार वर्ग आहे. ह्यांच्यासाठी शासन दरबारी कुठलीही ठोस योजना अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही.
उपासमारीमुळे ह्या लोकांना कोरोनाची भिती उरलेली नाही. एखादा तरी ग्राहक मिळेल म्हणून हे कामगार आजही स्टेशनवर फिरत आहेत. मात्र तिथे त्यांना पोलिसांचा सामना करावा लागतो आहे.असाच एक मुंबई स्थित कामगार शासनाकडे न्याय मागण्यासाठी रोज स्टेशनवर फिरताना दिसतो आहे आणि सरकारला मदत मागतो आहे.