मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
“टोल नाक्यावर मिळणाऱ्या या पावती मध्ये दडलंय काय? आणि ती का जपून ठेवली पाहिजे? त्याचे अतिरिक्त फायदे काय आहेत?” हे आज जाणून घेऊयात. अशी पोस्ट तुमच्या वाॅटस्एप, फेसबुक, ट्वीटरवर आलीय का? आली असेल तर ती ताबडतोब डिलिट करा ! तुम्हाला ती पोस्ट ज्याने / जिने कोणी पाठवलीय, त्याने / तिने त्याच्या / तिच्या शिक्षणाला आणि हातातल्या स्मार्टफोनला लाज आणणारा जो गाढवपणा केलाय, तो तुम्ही फाॅरवर्ड करू नका आणि स्वत:च्या शिक्षणाची लाज राखा !
टोल भरलेल्या रस्त्यावरून जातांना जर का तुमची गाडी अचानक बंद पडली तर तुमच्या गाडीला ‘टो-अवे’ करून घेऊन जाण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते. ही अर्धवट माहिती आहे. वास्तविक, ही सेवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. ती तुम्ही टोल भरलेल्या रस्त्यावर असो की टोल न भरलेल्या रस्त्यावर असो !
एक्सप्रेस हायवे वर जर का तुमच्या गाडीतील पेट्रोल संपलं किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्हाला अश्या वेळी तुमच्या गाडीच्या जागेवर येऊन पेट्रोल, एक्सटर्नल चार्जिंग देण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.पण, झालंच तर गाडी पूर्णपणे डाव्या साईड ला लावावी आणि टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर एक फोन करावा. दहा मिनिटात तुम्हाला मदत मिळेल आणि ५ ते १० लिटर पेट्रोल हे मोफत मिळेल. गाडी पंक्चर झाल्यास सुद्धा तुम्ही या नंबर वर संपर्क साधून मदत मिळवू शकता. ही माहिती सपशेल दिशाभूल करणारी आणि खोटी आहे. अशा प्रकारची कोणतीही सेवा देण्याची तरतूद महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंत्राटदारांमधील करारात नाही.
तुमच्या गाडीचा अपघात जरी झाला तरी तुम्ही किंवा तुमच्यासोबत असलेल्या कोणीही आधी हे टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधणं आवश्यक आहे. हीसुद्धा सर्वसाधारण सेवा आहे, जी टोल भरलेला नसेल तरी लागू आहे.
तुम्ही गाडीतून प्रवास करतांना जर का एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली आणि त्या व्यक्तीला जर तातडीने दवाखान्यात नेणं आवश्यक होऊ शकतं. अश्या वेळेस अँम्ब्युलन्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी टोल कंपन्यांची असते. अॅम्ब्युलन्स किंवा इतर तातडीचे क्रमांक टोल पावतीवर आपल्या सोयीसाठी छापलेले असतात. ती सेवा पुरवणं टोल कंत्राटदारांची जबाबदारी नाही.
टोल पावतीमुळे अमुकतमुक सेवा मिळतात आणि त्या सेवा देणं टोलप्लाझा चालवणाऱ्यांची जबाबदारी आहे, अशी पोस्ट तयार करून ती पसरवणं हा निव्वळ अतिशहाणपणा नसून तो खोडसाळपणाही आहे. त्यात टोलप्लाझा चालवणाऱ्यांना अधिकाधिक काॅल जावेत आणि त्यांना मनस्ताप व्हावा, असा दुष्ट हेतूही असू शकतो. ही माहिती नव्याने कळली असेल, त्यांनी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी.
थोडा विवेक वापरला तरी बनावट मजकूर पहिल्या नजरेतही ओळखता येतो. अशा प्रकारचा कोणताही मजकूर जो मोठ्या लोकसंख्येला प्रभावित करणारा असतो, तो भला असो वा बुरा, स्वत:ची खात्री असल्याशिवाय प्रसारित करू नका ! लक्षात ठेवा, एखादा बनावट मजकूर तुम्हाला गोत्यात आणू शकतो, कारण एखाद्या गोष्टीची खात्री नसताना प्रचार प्रसार करणं म्हणजे तुम्हीही गुन्ह्यातले भागीदार असता.
आपल्याला जर एखाद्या मजकुराबाबत शंका आली किंवा खात्री करून घ्यायची असेल तर आम्हाला 9175292425 या क्रमांकावर वाॅटस्एपद्वारे पाठवा.