बऱ्यावाईट परिणामांच्या मालिकांची अखंड मालिका !

बऱ्यावाईट परिणामांच्या मालिकांची अखंड मालिका !

बऱ्यावाईट परिणामांच्या मालिकांची अखंड मालिका !

थोडासा टाईमपास करायचा म्हटलं की आपसूकच रिमोट हातात घ्यावासा वाटतो. एकदा का रिमोट हातात पडला की सर्चिंग सुरू होतं, आपल्या आवडत्या मालिकांचं !

नोकरी करणारे आणि घरी असणाऱ्याच्या सुद्धा काही ठराविक मालिका ठरलेल्या असतात. त्या त्या वेळेत त्या लावल्या जातात, आणि स्वतःचा विरंगुळा करून घेतला जातो. आता पुढे काय होणार, याची उत्कंठा वाढवूनच ती मालिका आजच्या दिवसापुरती संपवलेली असते. उद्या बघायला मजा येणार असं म्हणतच उद्याच्या दिवसाची वाट बघितली जाते.

सासू-सुन, नवरा -बायको, प्रियकर-प्रेयसी, नणंद -भावजय, कधी विलन, कधी देवदूतासारखी तर कधी प्रामाणिक माणसं दाखवली जातात. साधारण जे आपल्या अवतीभवती घडत असतं तेच आपण या मालिकांमध्ये पाहत असतो. तर कधी असं होतं की, आपण जे पाहतो त्याचा परिणाम काहींच्या वागण्यावर होत असतो.

कधी सुंदर नात्यांची वीण दाखवली जाते तर कधी सुंदर नात्यात आलेली तेढ दाखवली जाते; पण हे मात्र नक्कीच की या प्रत्येक मालिकांचा शेवट हा गोडच असतो .

टीव्हीवर काही रियालिटी शो असतात. कधी हास्याचे कारंजे फुलवणारे कार्यक्रम असतात तर कधी साहस करायला लावणारे कार्यक्रम ! कधी नृत्याच्या स्पर्धा, तर कधी गाण्यांच्या स्पर्धा. उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट नर्तक यातूनच तर निवडले जातात. पुढे त्यांचं करिअर सुद्धा छान होतं. चार लोक त्यांना ओळखू लागतात. त्यांचं नाव होतं. प्रसिद्धी मिळते .

कधी कधी टीआरपी मिळवण्यासाठी सुद्धा विनाकारण मालिका वाढवल्या जातात. अगदी कंटाळा येतो कधी कहाणीत ट्विस्ट आले तर मजाच वाटते. थोडे घरातले ताणतणाव या मालिकांमुळे कमी होतात. या मालिकांची शीर्षक गीते तर इतकी सुंदर असतात की, सतत गुणगुणत राहाविशी वाटतात.

खरं तर या मालिका सध्या माल_ईका (विका) अशाच झाल्या आहेत. स्वतःचा विरंगुळा व्हावा म्हणून बरेच जण बघतात. अगदी मालिकेत घुसतात सुद्धा. खरं तर एक कथानक म्हणून मालिका बघाव्यात. काही मालिका उत्तम असतात. बोधामृत मिळतं. काही मालिका विषाची विखारी बीजं पेरतात. हे समाजहिताचे कधीच नसते.

सध्या भरकटलेल्या मालिकांचा काळ आहे. त्यापेक्षा युट्यूबवर अधिक माणसं रमू लागली. आता मालिकांचा सुवर्णकाळ जवळ जवळ संपत आलाय. रियालिटी शो तेवढे तग धरून राहतील, असे वाटते.

एकंदर मालिका घरांचं भलं करतील वा प्रबोधन करतील असं आता वाटत नाही. विसावं शतक खऱ्या अर्थानं मालिकांचं होतं. ह्या शतकात मालिका थोड्या गडबडून गेल्या आहेत. गोटया सारखी मालिका पुन्हा होणे नाही..

तरीही मालिकांची मालिका चालूच राहते. आपण त्यात गुंतत जातो. कधी नट- नट्यांच्या कपड्यांवर भाळतो. तर कधी त्यांनी केलेल्या स्टाईलने राहायला बघतो. तीच स्टाईल पुढे फॅशन म्हणून प्रसिद्ध होते. कोणाचे दागिने आवडतात, कोणाची हेअर स्टाईल आवडते, कोणाची बोलण्याची लकब, तर कोणाची ॲक्टिंग खूप आवडते.

या मालिका कधी स्वप्नांच्या जगात घेऊन जातात, तर कधी वास्तवाचं भान करून देतात. अशा या मालिकांची मालिका अखंड सुरू आहे. न थकता, न थांबता….

 

 

 

नंदा गवांदे

लेखिका शिक्षिका आहेत.

gawandenanda734@gmail.com

 

MediaBharatNews

Related Posts
comments
  • खुप सुंदर लेख

  • श्रीश जोशी

    September 23, 2021 at 3:11 pm

    *टीव्ही सिरीयल म्हणजेच मालिकाचं जग*
    मालिकांच्या दर्जापेक्षा लॉक डाऊन मधील हक्काचा विरंगुळा म्हणूनच गृहिणी आणि जेष्ठानी त्यांना पसंती दिली. परंतु मालिका च्या दर्जाबद्दलचे लेखिकेचे निरीक्षण योग्यच आहे.
    शुभेच्छा

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!