पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिन अर्थात बालदिन, उल्हासनगर महानगरपालिकेने 'संकल्प निरोगी बालकत्वाचा' हे अभियान सुरू करत साजरा केला. शाळा परिसर स्वच्छता व आरोग्य तपासणीसोबतच उल्हासनगर महानगरपालिकेने निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धांमध्ये उल्हासनगरातील ११८ शाळांतील प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आज १४ नोव्हेंबर रोजी बालदिनी स्पर्धेची अंतिम फेरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत संपन्न झाली. त्यातून सर्वोत्कृष्ट १८ विद्यार्थ्यांची निवड घोषित करण्यात आली आहे.
निबंध स्पर्धेतील प्राथमिक गटात विकास विद्यामंदिर शाळेतील ६ वी ची विद्यार्थिनी पूर्वा खैरे पहिली आली, तर माध्यमिक विभागात महाराष्ट्र मित्र मंडळाची दहावीची विद्यार्थिनी विशाखा सांबरेने पहिला क्रमांक पटकावला.
वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात मनपा शाळा क्रमांक २४ मधील ७ वी तील विद्यार्थिनी रेश्मा शिंदे आणि माध्यमिक गटात पेट ऑक्सफर्ड शाळेतील दहावीतील विद्यार्थी आरूश गुप्ता यांनी पहिला क्रमांक पटकावला.
चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात आरजीएस शाळेतील ७ वीतील विद्यार्थिनी कादंबरी लोंढे आणि माध्यमिक गटात झाकीर हुसेन शाळेतील ९ वीतील विद्यार्थिनी अंसारी राफिया तहजिब यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
असा आहे स्पर्धेचा संपूर्ण निकाल :
विशेष म्हणजे महापालिकेने स्पर्धा समित्यांत मनपा शाळांसोबत खाजगी शाळांतील शिक्षकांनाही सामावून घेतलं होतं. निबंध स्पर्धा समितीत अनिल पाटील, शशिकांत पाटील, ज्योती वेखंडे, केशव चव्हाण व रविंद्र पाटील यांचा समावेश होता. तर परीक्षक म्हणून सुमित्रा जाधव, विनोद सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, सायली मलबारी, अमोल गुळवे व नितीन वाबळे यांनी काम पाहिलं.
वक्तृत्व स्पर्धा समितीत दिनेशचंद्र गुप्ता, भास्कर शिंदे, रोहिणी काकडे, रजनी सोनवणे, योगिता होलगीर यांचा समावेश होता. परीक्षणाची जबाबदारी पंकज पवार, लता पाटील, छाया भदाणे, प्रकाश वाघ, वाढविंदे व दिक्षा मोरे यांच्यावर होती तर चित्रकला स्पर्धा समितीत परशुराम चौधरी, श्याम घरत, चंचल वाघ, अमोल साबळे, धनाजी पवार यांचा समावेश होता, तर परीक्षणाची जबाबदारी विजया मोरे, योगिता देशमुख, नितीन पाटील, अरूण अहिर, महेंद्र पाटील, पल्लवी एडके यांच्यावर होती.
उल्हासनगर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या बालमहोत्सवाला शाळांनी दिलेला प्रतिसाद जोरदार असून त्यामुळे प्रोत्साहित होऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम पुढेही राबवण्यात येणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितलं. त्याचसोबत नवनवीन शैक्षणिक संकल्पना सुचवण्याचं आवाहनही लेंगरेकर यांनी शहरवासीयांना केलं आहे.