पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या संकल्पनेतून घोषित 'संकल्प निरोगी बालकत्वाचा' या अभियानांतर्गत शाळा परिसर स्वच्छता व आरोग्य तपासणीसोबतच उल्हासनगर महानगरपालिकेने निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धांमध्ये उल्हासनगरातील ११८ शाळांतील प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सोमवारी, १४ नोव्हेंबर रोजी बालदिनी स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून त्यातून सर्वोत्कृष्ट १८ विद्यार्थ्यांची निवड घोषित केली जाणार आहे.
'संकल्प निरोगी बालकत्वाचा' या उपक्रमांतर्गत १० नोव्हेंबर रोजी स्पर्धांची पहिली फेरी शाळा स्तरावर घेण्यात आली.
स्पर्धेत प्राथमिक विभागातून निबंध स्पर्धेत ५ हजार १३, वक्तृत्व स्पर्धेत ४ हजार ३३१ आणि चित्रकला स्पर्धेत ५७५३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. माध्यमिक विभागातून निबंध स्पर्धेत १८६१, वक्तृत्व स्पर्धेत १२८९ आणि चित्रकला स्पर्धेत १८१९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
दुसरी फेरी ११ नोव्हेंबर रोजी समूह साधन केंद्र स्तरावर घेण्यात आली व आता अंतिम फेरी १४ नोव्हेंबरला उल्हासनगर पश्चिमेकडील छत्रपती शाहू महाराज विद्यालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत होणार आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या बालमहोत्सवाला शाळांनी दिलेला प्रतिसाद जोरदार असून त्यामुळे प्रोत्साहित होऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम पुढेही राबवण्यात येणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितलं.