मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
नुकतेच सीबीएसईने आपले १२ वीचे निकाल जाहीर केले. या परिक्षेत देशभरातल्या ब-याच विद्यार्थ्यांनी घवघवयीत यश संपादन केलं, पण ह्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक चेहरा चर्चेचा विषय ठरला.नोयडास्थित दिल्ली पल्बिक स्कूलचा विद्यार्थी जैद हसन.
जैदने बारावीच्या परिक्षेत ९७.४% इतकं प्रचंड यश मिळवलय. त्याला ५०० पैकी ४८७ गूण आहेत आणि मिळालेल्या ४८७ पैकी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गूण आहेत.
खरं तर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयात किती गुण मिळाले, ह्यावरुन त्याचं मुल्यांकन व्हायला हवं होतं, पण तो विषय त्याच्या धर्माशी जोडून त्याच्या हुशारीचा अपमान होतो आहे, ही गोष्ट भारतातला सो कॉल्ड मिडिया विसरून गेला आणि जैद हसन नावाच्या मुस्लिम मुलाला संस्कृत मध्ये १०० गूण मिळाले ह्या मथळ्याखाली बातम्या झळकू लागल्या.
पण जैदचा पुढे जाऊन फिरोज होणार नाही याची जबाबदारी आपण घेणार आहोत का? अजून वर्षही झालं नाही. आपल्या धर्मनिरपेक्ष देशाला लाजवणारी एक घटना बनारस हिंदू विश्वविद्यालयात (BHU) घडून गेलेली आहे.
जयपूर मधील बगरुस्थित डॉक्टर फिरोज खान बनारस विश्वविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर नियुक्त झाले. वडील रमजान खान यांच्या चार मुलांपैकी ते एक होते. चारही मुलांनी संस्कृत विषयाचा अभ्यास केला. चौघानांही वेदांची सखोल माहीती. रमजान रामकृष्णांची भजनं गाऊन आपला परिवार चालवायचे. (कोणी कोणता व्यवसाय करुन घर चालवावे ह्याबद्दल आक्षेप नाही, पण ह्या परिवाराला ह्याची काय किंमत चुकवावी लागली ह्यासाठी हा उल्लेख करणे गरजेचे आहे ).
फिरोज खानच्या संस्कृत विषयाच्या अभ्यासावर प्रभावित होऊन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांचा सन्मानही केला. पाहता पाहता फिरोज खान आणि त्यांची संस्कृत या विषयावरची पकड हा चर्चेचा विषय ठरला आणि अशातच त्यांना वाराणसी स्थित बनारस विश्व विद्यालयात नोकरी मिळाली. आणि ते तेथे संस्कृत विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले.
७ नोव्हेंबर २०१९ ला विश्वविद्यालयातील संस्कृत विद्या धर्म विज्ञान शाखेचे विद्यार्थी उपोषणाला बसले. प्रदर्शन करू लागले. त्यांची मागणी होती फिरोज खाननी आम्हाला संस्कृत शिकवू नये.फिरोज खानची तात्काळ हाकलपट्टी करावी. कारण स्पष्ट होतं – एक मुस्लिम तरुण हिंदूना संस्कृत कसा काय शिकवू शकतो?
खरं तर ह्या दोन घटना दोन काळाला जोडणा-या आहेत. जैदचा भविष्यकाळ हा फिरोज खान सारखा असू नये. जैदने संस्कृत आपल्या भावाच्या म्हणण्यानूसार तो एक चांगले मार्क मिळवून देणारा विषय म्हणून निवडला होता.भविष्यात त्याला अभियांत्रिकीमध्ये करिअर करायचं आहे.त्याच्या वाटेवर भाषिक, प्रांतीय, धार्मिक बंधनं येऊ नयेत. भाषा कोण्या एका समुदायाची मक्तेदारी ठरु नये. भाषा ही धर्माशी न जोडता ती केवळ व्यक्त होण्याची बोली असावी. भविष्यात जैद चा फिरोज होऊ नये.
कायद्याने वागा लोकचळवळीचे नांदेड जिल्हा समन्वयक व मिडिया भारत न्यूजचे कार्यकारी संपादक.