मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
शहरापासून गाव, गावापासून वाडी-वस्तीला जोडणारी महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजेच एस.टी. जिला आपण पण सर्वजण प्रेमाने लालपरी सुद्धा म्हणतो ती आज ७३ व्या वर्षात पदार्पण करतेय.
१९४८ पासून सुरू झालेला हा प्रवास आज वर अविरत सुरु आहे या प्रवासात तिने केवळ गावं- शहरंच नाही तर माणसांनाही एकमेकांशी जोडले आहे, त्यामुळेच आपल्या प्रत्येकाचं तिच्याशी एक आपुलकीचं भावनिक नातं आहे तसंच माझंही काहीसं आहे.
मुळात मला भरपूर फिरण्याची आवड आणि त्यातच सामाजिक क्षेत्रात असल्याने ही संधी अधिक मिळत गेली. अगदी पालघर पासून गडचिरोली, नंदुरबार पासून ते अगदी सोलापूर-कोल्हापूर पर्यंत अखंड महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यात फिरलो ते या लालपरीच्या सोबतीने.
महाराष्ट्र म्हणजे वैविध्य भाषा, हवामान, राहणीमान सर्वच प्रदेश बदलला हे चटकन लक्षात येते ते यामुळेच पण लालपरी सर्वत्र सारखीच वाटते. इतकेच नव्हे तर गुजरात मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा या राज्यात दिसली ही आपलेपणाची भावना अधिक दाटून येते; जणू परदेशात आपलं माणूस भेटावं.
एसटीच्या सुविधा, दर्जा, बस स्थानकं, तिकीट दर याबद्दल अनेकदा तक्रारीचा नकारात्मक सुद्धा ऐकायला मिळतो, त्याबद्दल आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते वेळोवेळी आवाजही उठवतात परंतु त्यावर आज बोलणार नाही त्याबद्दल त्या त्या वेळी बोलूच. पण आज तिच्या वेगळेपणा बद्दल जाणून घेऊ.
महाराष्ट्रातील ही सेवा देशातील सर्वात सुरक्षित मानली गेली आहे. वाडी-वस्तीवर, दुर्गम पाड्यांवर मुक्कामी राहणारी एसटी सेवा ही केवळ महाराष्ट्रातच असावी. तालुक्याच्या शाळांना जाण्यासाठी ती एकमेव आधार असते, तलाठ्याला भेटण्यापासून ते अंगणवाडी सेविकेला गावात सोडणारी एकटीच असते. बाजारहाट म्हणू नका की दवाखाना आजही एसटी लाखो लोकांचा एकमेव आधार आहे.
मेळघाटातल्या सर्वात दुर्गम गावात मुक्कामी राहणारी एसटी, तिच्यासोबत घनदाट जंगलात रात्र काढणारे चालक- वाहक यांच्याशी जेव्हा संवाद साधायचो त्यावेळी नकळत या सर्वांबद्दल कौतुकाची भावना मनात दाटून येत होती.
४५-४६ सेल्सिअस तापमानात शर्ट काढून बस चालवणारे ड्रायव्हर कधी शिस्तभंग करत आहेत, असं कधीच वाटलं नाही. ते त्यामुळेच की कंडक्टरला मामा किंवा काका याशिवाय दुसरी हा कधी निघालीच नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्राला बांधून ठेवण्यात यांचं मोठे योगदान आहे.
आज एसटीच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त सर्व कर्मचारी आणि आपणास सर्व प्रवाशांना मनःपूर्वक सदिच्छा.
लेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे महाराष्ट्र राज्य संघटक आहेत.
Mukesh Paithane
लाल परी जणु खरंच खेड्या पाड्यात राहणाऱ्या लोकांचा श्वास. जेंव्हा गाडी मुक्कामाला थांबायची गावात लहानपणी, खूप आवडायची ती. हा वेगळ्याच प्रकारचा नॉस्टॅल्जिया लालपरी सोबत. ?. मी तर आवर्जून गाडीची वाट पाहत बसायचो, किनगाव वरून माळावर गाडी आली की तिचाच तो एक आवाज आणि तिच्या headlight चा प्रकाशझोत.. लहानपणी काही भारीच वाटायचं..
Akshay Ashok sonde
खरंच इतक्या गरमी मध्ये शर्ट काढून सुखरूप पोहचविणारे आणि कितीही रात्री वाहक हे दोन्ही डोळ्यावर झोप न ठेवता प्रवाशांची सेवा करतात… खरचं सल्यूट लालापरी आणि तिला अशीच
कायम धगधगत्या मशाली प्रमाणे ठेवण्यासाठी त्या सर्व कामगारांना देखील