क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने फातिमाबीसावित्री उत्सवाचं आयोजन केलं जातं. यंदाचं उत्सवाचं दहावं वर्ष.
यंदाचा कार्यक्रम शनिवार, १३ जानेवारी २०२४ रोजी सायं. ५ वाजता उल्हासनगरातील शहीद जनरल अरुणकुमार वैद्य टाऊन हॉलमधील दुसऱ्या मजल्यावरील बॅन्क्वेट हॉल मध्ये होत आहे.
गंगोत्री वेल्फेअर फाऊंडेशनच्या अध्यक्ष हरकिरणकौर (सोनिया) धामी स्वागताध्यक्ष असतील.
आपल्या आयुष्यातील तसंच सभोवतालच्या प्रतिकूल सामाजिक परिस्थितीवर मात करत जिद्दीने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या, आत्मभान जपणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातून निवडक ५ स्त्रियांना फातिमाबीसावित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.
उच्चशिक्षित, बीसीए, बीए भरतनाट्यम, फोकडान्समध्ये पीएचडी केलेल्या नांदेडच्या डॉ. सान्वी जेठवानी, भाऊ गंभीर आजारात असताना त्याच्या व्यवसायाच्या पर्यायाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर झेलणाऱ्या सोनाली अभंग, नवऱ्याच्या छळाने डगमगून न जाता स्वतंत्रपण आयुष्य जगून जिद्दीने मुलीचं करीअर उभं करणाऱ्या चंद्रपूरच्या खैरुन शेख, नवऱ्याच्या आत्महत्येनंतर समाजाच्या टीकेला भीक न घालता प्रश्नमंजुषेच्या खेळात सहभागी होऊन प्रगतीसाठी धडपडणाऱ्या जळगांवच्या शेतकरी ललिता जाधव आणि मुलीच्या आडनावाजागी स्वतःचं नाव लावण्यासाठी लढा दिलेल्या अंबरनाथच्या स्वाती पाटील यांना यंदाचा फातिमाबीसावित्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या वंदना शिंदे आणि सावित्रीबाई फुले संशोधनपर ग्रंथाची निर्मिती करणाऱ्या लेखिका आशालता कांबळे यांचाही कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
सिनेनाट्य कलावंत व सामाजिक कार्यकर्त्या सुषमा देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ तसंच २०१६ च्या सावित्री पुरस्कार मानकरी लेखिका शिल्पा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा साकार होणार आहे.