मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
आता सध्या सगळ्यांच्या तोंडात वादळामुळे काय नुकसान झालं, याचीच विचारपूस केली जात आहे.पण याच्याही पलीकडे सामान्य नागरिकांना जगण्याचे काही साधे साधे प्रश्न सुद्धा असतात.त्याची दखल मात्र घेतली जात नाही. वादळाने खूप नुकसान झालेले आहेच, पण प्रशासनाने इतरही प्रश्नांची दखल घ्यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे. लाॅकडाऊन काळात घराच्या खळ्यातला वर्षभराचा सुका बाजार चोरीला गेलेल्या ब्रिजेश तांबोळी यांची व्यथा अशीच वेगळी आहे.
अलिबागमध्ये असणारा वरसोली बीच अतिशय सुंदर आणि सुरक्षित आहे.सुरुवातच नारळाच्या वाडीने होते. अगदी बीचला लागूनच भरगच्च, दाट असे सुरूचे बन होते. त्या बनामुळे बीचला विशेष शोभा यायची.फेसळणारा समुद्र त्यामुळे आकर्षक वाटायचा. आज तो पोरका झाल्यासारखं वाटतो. वादळामुळे सारं काही उध्वस्त झालंय. आकाशाला भिडणारी झाडं जमीनदोस्त झालेली आहेत.
तिथून पुढे वरसोली कोळीवाड्याकडे रस्ता जातो.तिथेही वादळामुळे खूप नुकसान झालं आहे.लोकांचे छत उडून गेले आहेत. कौलं तुटलीत. घरं उघड्यावर आलीत. सुरूच्या बनातील झाडं लोक सरपणासाठी तरी होतील. तो तरी खर्च वाचेल म्हणून घेऊन जात आहेत. त्या ठिकाणी ब्रिजेश तुकाराम तांबोळी यांच्याशी बोलणं झाले.
वादळाने तर नुकसान केलं आहेच, पण लॉकडाऊनमध्येही आमचे खूप नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांच्या खळ्यातील पूर्ण वर्षभराचा सुका बाजार चोरीला गेलेला आहे.त्याची त्यांनी पोलीस तक्रार केलीय. पोलिस इतकंच म्हणतात की आम्ही शोध घेऊ आणि कळवू.
मच्छिमारीचा व्यवसायसुद्धा पाहिजे तसा चालत नाही. त्यांच्या बंदरावर रात्री बेरात्री जावे लागते. त्यासाठी लाईटची देखील सोय नाही; म्हणजे त्यांचं जगण्याचं साधन हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हिरावून घेतले जात आहे. यात सरकारने जी काही मदत जाहीर केलेली आहे. त्यातली थोडीफार तरी आमच्या वाट्याला यावी. आमच्या जगण्याला हातभार लावावा. ब्रिजेश तांबोळीसारख्या मच्छीमारांची इतकीच विनवणी आहे.
व्यवसायाने शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या, मिडियाभारतन्यूज च्या अलिबाग प्रतिनिधी तसंच कायद्याने वागा लोकचळवळीच्या अलिबाग तालुका समन्वयक