मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
ज्येष्ठ विचारवंत तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. हरी नरके यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना आमने सामने चर्चेचं खुलं आव्हान दिलंय. प्रश्नांपासून पळ काढू नका, असंही नरके यांनी फडणवीसांना बजावलंय.
ओबीसींचं राजकीय आरक्षण नेमकं कोणामुळे गेलं यावरून राजकीय पक्षात वादविवाद सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याचं खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडलंय. पण हरी नरके यांनी अनेक पत्रव्यवहार, दस्तावेज समोर आणत फडणवीस कसं खोटं बोलताहेत आणि ओबीसींची दिशाभूल करतायंत, याचा भांडाफोड सुरू केलाय.
१) केंद्राचा डेटा मागू नका म्हणता, तर तुम्ही स्वतः १/८/२०१९ ला केंद्राकडे का मागितला होता?
२) तुमच्या ग्रामविकास मंत्र्यांनी ८ आठवड्यात आम्हाला सर्वोच्च न्यायालयाला माहिती द्यायचीय, तरी त्वरा करा, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना का लिहिले होते? तुम्ही आठ आठवड्यातही माहिती न्यायालयाला दिली नाही म्हणून आरक्षण गेले. हे पाप तुमचे.
३) जी माहिती २०१६ मध्ये मोदी सरकारने बॅन केली, तिची पावती तुम्ही काँग्रेस सरकारवर का फाडता?
४) त्या माहितीत८कोटी चुका असल्याचा जावईशोध तुम्ही कसा लावला? केंद्र सरकारने तुम्हाला डझनावारी पत्रे लिहिली. त्यात तर एकाही चुकीचा उल्लेख नाही, मग हा डेटा न बघताच तुम्हाला ८ कोटी चुका असल्याचा भास झाला का?
५) तुमच्या मातृसंस्थेने जातगणनेला लेखी विरोध केला होता. (२४/५/२०१०)म्हणून तीत चुका असल्याचा डंका तुम्ही पिटताय. कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
६) ३महिन्यात डेटा जमवता येतो तर ६० महिने काय केले?
७) डेटात चुका होत्या तर मोदी सरकारने नवा, बिनचूक obc डेटा गेल्या ७ वर्षात का जमवला नाही?
८) न्या.रोहिणी आयोगाला डेटा दिला नाही म्हणता, मग ज्यांच्या ताब्यात तो आहे, त्या RGI ना या आयोगात सदस्य कशासाठी नेमलंय?
९) केंद्र सरकार एकही चूक असल्याचे सांगत नसताना तुम्हाला ८ कोटी चुका कशा कळल्या?
फडणवीसपंत, प्रश्न मी जाहीरपणे समाज माध्यमे व वाहिन्यांवरून तुम्हालाच विचारलेत, जाहीर उत्तरे द्या, पळ काढू नका, असा टोला हरी नरके यांनी लगावलाय.
“आरक्षणमुक्त भारताचे तुम्ही पाईक असताना ” बहुजनांचा बुद्धीभेद नि शब्दच्छल करण्याचा पिढीजात उद्योग का करताय? करता का आमने सामने चर्चा? ओपन चॅलेंज करतो,आहे हिम्मत? असं प्रा. हरी नरके यांनी फडणवीसांना विचारलंय.