कायद्याने वागा लोकचळवळीचा माझ्या खांद्यावरचा भार त्याने स्वत:च्या खांद्यावर घेतलाय !!!

कायद्याने वागा लोकचळवळीचा माझ्या खांद्यावरचा भार त्याने स्वत:च्या खांद्यावर घेतलाय !!!

कायद्याने वागा लोकचळवळीचा माझ्या खांद्यावरचा भार त्याने स्वत:च्या खांद्यावर घेतलाय !!!

राकेश पद्माकर मीना. कायद्याने वागा लोकचळवळीचा राज्य संघटक. खरंतर हल्ली चळवळीचं सगळं काम राकेश बघतोय. कवी वृषाली विनायक हिच्यामुळे राकेशची ओळख झाली आणि बघता बघता तो कायद्याने वागा लोकचळवळीत महत्त्वाची भूमिका निभावणारा सदस्य ठरला. एक प्रकारे त्याने माझ्या खांद्यावरचा भार हलका केला.

आज महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये कायद्याने वागा लोकचळवळीचं अस्तित्व तयार झालं, त्यात राकेशची मोठी मेहनत आहे. तो कायद्याने वागा लोकचळवळीचा अत्यंत प्रामाणिक समर्थक आहे. जिथे बसतो, तिथे तो या चळवळीबद्दल भरभरून बोलतो. संधी मिळेल तिथे भोवतालच्या लोकांना चळवळीची माहिती देतो. त्यांना चळवळीत सहभागी होण्यासाठी तयार करतो. पुढे संपर्क ठेवतो, न कंटाळता मार्गदर्शन करतो. कायद्याने वागा लोकचळवळीच्या सगळ्या उपक्रमांचं नियोजन आता वृषाली विनायक आणि राकेश करतात. त्यांच्यात ती चळवळ भिनली आहे. येणाऱ्या काळाची आव्हानं त्यांनी ओळखली आहेत. विनम्रपणे चर्चा करून ती सखोल जाणून घेतली आहेत. त्यांना सामोरं जाण्यासाठी लागणारं बहुकौशल्य आणि वैचारिक व्यापकतेची गरज त्यांनी समजून घेतली आहे. वृषाली आणि राकेश महाविद्यालयीन मित्र आहेत. त्याचं रसायन खूप चांगलं जुळतं. तेच कायद्याने वागा लोकचळवळीची ताकद बनलंय. चळवळीची शिबिरं, कार्यक्रम, उपक्रम, माझी व्याख्यानं, दौरे, आंदोलनं, मोहिमा या सगळ्यात राकेश एक कार्यकर्ता म्हणून राबतो. पूर्वनियोजन करतो आणि सहकाऱ्यांसोबत तडीला नेतो. भावनिक राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांचा अतिउत्साही कार्यकर्ता ते कायद्याने वागा लोकचळवळीचा राज्य संघटक हा राकेशचा प्रवास परिवर्तनाचं काम करणाऱ्या चळवळीसाठी एक सकारात्मक उदाहरण आहे. शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसून ऐकलेली भाषणं आणि अलिकडे धम्म चक्र प्रवर्तन दिनाला केलेल्या भाषणापर्यंतचा प्रवास मांडताना राकेशने फेसबुकवर लिहिलेली तो दसरा ते हा दसरा ही पोस्ट पुरेशी बोलकी आहे. तो जातीपाती, धर्मद्वेष, भाषा, प्रांत, लिंगभेदांच्या पलिकडे गेलेला अस्सल माणूस आहे. हळवा आहे, प्रसंगी कणखरही आहे. प्रामाणिक आहे, संयमी आहे. कुठल्याही प्रकारचा एकारलेपणा मनाला शिवू द्यायचा नाही आणि संवादावर विश्वास ठेवून वाटचाल करायची, हे कायद्याने वागा लोकचळवळीचं तत्व तो नेमकं पाळतो. संविधानिक समाजाच्या निर्मितीसाठी कायद्याने वागा लोकचळवळीच्या माध्यमातून मी पाहिलेलं खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक भारताचं स्वप्नं मला आता राकेशच्या डोळ्यांत दिसतं.


– राज असरोंडकर

संस्थापक, कायद्याने वागा लोकचळवळ


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!