महिलांना रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित वातावरण असावे, अनुचित घटना होऊ नयेत, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत असं प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती मा. ना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं.
रेल्वेमधील प्रवासी महिलांची सुरक्षा या विषयाच्या अनुषंगाने विधानभवनातील सभाकक्षात संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी या बैठकीत मागील बैठकात दिलेल्या निर्देशावर कोणती अंमलबजावणी झाली याची माहिती सर्वप्रथम घेतली गेली.

ट्रेनमधे क्युआर कोड सिस्टम असावी, सुरक्षागार्डची असलेली कमतरता पूर्ण करणेबाबत पाठपुरावा करावा, निर्भया फंड रेल्वे पोलिस यांना उपलब्ध करावा, शासकीय पीडितांसाठी त्यांच्या शारिरिक उपचारानंतरही तो उपलब्ध झाल्यास मनोधैर्य वाढवण्यास मदत होईल, तसंच बेकायदेशीर व्यक्ती, गर्दुले लोकांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, सामाजिक संस्थाच्या प्रश्नांबाबत काय अंमलबजावणी केली ती त्यांना बैठकीत समजावे म्हणून अहवाल तयार करावा, दक्षता समिती महिला व महिला सुरक्षा कर्मचारी यांचे वॉट्सअप ग्रुप करावेत, तसंच विशिष्ट वेळेनुसार स्वयंसेवी प्रवासी महिलांचे वॉट्सअप ग्रुप करावेत. दक्षता समिती सदस्याच्या लोकेशनबाबत डैशबोर्ड तयार करावेत, मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव तयार करावा. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष रेलवे स्टेशनवर करावा. महिलांच्या डब्यामध्ये ऑटोमॅटिक सेनेटरी नॅपकीन मशीन आणि चेंजिंग रूम असावी. रेल्वे स्टेशन व रेल्वेतील सीसी टिव्हींचे ऑनलाईन मानिटरिंग व्हावे, असे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले.
महिला प्रतिनिधींनी डार्क स्पॉट्स आणि सिग्नलला अपघात घडतात त्याबाबत सूचना केल्या. तसेच एस्केलेटर चढत असताना साध्यापायऱ्या विनाआधार असतील त्या दुरुस्त कराव्या या संबंधी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

ZRUCC अध्यक्ष व रेल्वे महिला प्रवासी संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्षा वंदना सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघ उपाध्यक्षा ललिता मोरे यांनी विठ्ठलवाडी स्टेशन येथील सरकता जिना चढताना ज्या पायऱ्या आहेत, त्या चढताना आधार असावा असं सुचवलं.
या संपूर्ण प्रश्नाबाबत रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनाही सविस्तर पत्र पाठविले असल्याबाबत डॉ गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

रेल्वे पोलिसांशी संबंधित प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी तातडीने सहकार्य करावे असे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र गृहविभाग प्रधान सचिव अनुपकुमार सिंह यांना दिले. तसेच सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशाही सूचना पोलीस व रेल्वे प्रशासन यांना दिल्या.

रेल्वे प्रवाशांचा फटका मारून दुखापत व लुट करणाऱ्या फटका गॅगवर नियंत्रण आणल्याबद्दल रेल्वे पोलिसाचे या बैठकीत अभिनंदन करण्यात आले.
या बैठकीस गृहविभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंह, रेल्वे सुरक्षा अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ प्रज्ञा सरवदे, रेल्वे पोलिस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे, मध्य रेल्वे अतिरिक्त महाव्यवस्थापक ऋषी शुक्ला, मा विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपस्थित होते. तसंच महिला दक्षता समितीच्या रेणुका साळुंखे, अरुणा हळदणकर, लीला पटोडे, आशा गायकवाड, प्रतिका वायदंडे यावेळी उपस्थित होत्या.