मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
एका नव्या कार्यकर्त्याने बोलता बोलता एक खंत व्यक्त केली की डॉक्टर गेल ऑम्व्हेट एवढ्या मोठ्या विचारवंत होत्या, तर त्या आमच्या पिढीपर्यंत का पोहचल्या नाहीत ??
मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की, हा समाज ज्ञानाकडे आणि वर्तमानकडे पाठ फिरवून चालत आहे. त्याला ज्ञानाकडे आणि वर्तमानाकडे वळविण्याचा प्रयत्न प्रामाणिक कार्यकर्ते करत असतात ; परंतु जागतिकीकरणाच्या काळात ज्यांचा जन्म झाला आहे, ती पिढी आडियलॉजीपासून दूर गेली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या चक्रात ती ‘स्व’च्या भयंकर प्रेमात पडली आहे. रात्रीत चळवळीचे स्टार बनण्याची चढाओढ त्यांच्यात दिसून येते. समाजाशी प्रत्यक्ष सबंध तुटल्याने त्यांना माणूस असा का आहे? हे वरवर समजते, पण जाणिवा आणि नेणिवेच्या पातळीवर त्याचे विश्लेषण करता येत नाही.
उत्तर आधुनिकतावादाच्या भोवऱ्यात अडकल्याने त्यांना इतिहास, वैचारिकता वगैर गोष्टीमध्ये काही रस नसतो. काही मुले सन्माननीय अपवाद म्हणून खोलात जाऊन अभ्यास करतात, पण ते अपवाद म्हणूनच!!
जर त्यांनी वैचारिकताच नाकारली आहे तर ते कश्याला मागच्या पिढ्यांच्या विचारधनाचा मागोवा घेतील?? महामानव हे त्यांच्यासाठी फक्त नावे म्हणूनच पोहचतात, विचार म्हणून नव्हे!!
डॉक्टर गेल या काही व्यवस्थासमर्थक विचारवंत नव्हत्या त्यामुळे व्यवस्था अश्या लोकांना ज्यास्त वर येऊ देत नाही. उथळ लोक विचारवंत म्हणून चमकतात आणि तेवढेच लोक या पिढीपर्यत पोहचतात ।
धरणग्रस्त नावाचे लोक या जगात जगतात याचीच त्यांना कल्पना नाही तर ते कश्याला भारत पाटणकर यांच्या कामाची दखल घेतील ? त्यांना भारत आणि गेल या दोन डॉक्टरांनी काय लिहिले, काय सोसले, याची त्यांना काय कल्पना असणार ??
एक बाजूने उत्तर आधुनकता आणि दुसऱ्या बाजूने मार्केट याच्या चक्रात अडकलेल्या पिढीला जेव्हा मृत्यूनंतर कळते की, अरे अशी माणसे पण जगात आहेत!! तेव्हा ते तक्रार करणारच की तुम्ही आम्हाला हे का नाही सांगितले??
पण या गोष्टी सांगून कळतात काय?? त्यासाठी ज्ञानाची भूक असावी लागते, जी बाबासाहेबांना होती, जी महात्मा फुले यांना होती !! जी शरद पाटील यांना होती !!ती भूकच गायब आहे !! उरला आहे फक्त शब्दांचा खडखडाट!!
ज्ञानाची भूक लागलेले लोक काय काय दिव्य करतात याची कल्पना येणे महत्वाचे !!! बाजरू माहितीच्या आधारे चळवळ उभी राहत नाही, तर त्या त्या काळातल्या विचारवंतांनी जे पापड लाटले आहेत ते सुद्धा समजून घ्यावे लागतात!!
मुळातून वाचन करणे संपल्याने उथळ अस्मिता टोकदार होतात आणि मग एकदम आधुनिक तंत्रज्ञान हाताशी असलेली पिढी एकमेकांचे DNA चेक करत बसतात !
नव्या पिढीला ज्ञानाच्या , प्रज्ञेच्या हमरस्त्यावर आणणे हे या काळाचे मोठे आव्हान आहे, हे मागच्या पिढीच्या लोकांनी समजून घेतले पाहिजे. त्यांना तुमच्या पराक्रमाच्या कहाण्यामध्ये ज्यास्त रस नाही त्यांना एवढेच कळते की , शेवटी तुम्ही त्यांना कोणते जग बहाल केले आहे !!
डॉक्टर गेल यांची तळमळ होती की माझे नव्हे तर आपल्या समग्र चळवळीने जे संशोधनपर काम केले आहे ते नव्या पिढीपर्यंत पोहचावे ; त्यामुळे आता शोकसभा होतील, प्रत्येकजण डोळ्यात पाणी आणून सांगेल की डॉक्टर किती ग्रेट होत्या. हे सांगणे साहजिकच आहे पण त्यांच्या संशोधनाचे काम पुढील पिढीकडे कसे जाईल याची योजना जर कुणी सांगितली आणि ती कृतीत आणण्यासाठी काही नवे काम उभारले तर ती खरी श्रद्धांजली असेल !!