मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
आपलं स्टेशन आल्यावर संत्या मेट्रो मधून खाली उतरला. साला एक मराठी माणुस नाही डब्यात सगळं ते छु आणि छे ऐकून आधीच डोकं भणभणायला लागलेलं. घशाला कोरड पडलेली. स्टेशन बाहेरच्या गुप्ताच्या दूकानात तो पाण्याची बाटली घ्यायला गेला. दिड शे रुपये काऊंटरवर टेकवून त्याने पाण्याची एक छोटी बाटली मागितली.
ओ साब हिंदी बोलो. मराठी बोलना है तो जाओ वो कर्जत कसारा. और पानी का भाव बढ गया है, दस रुपया और दे दो.
संत्याने निमुट दहा रुपये देऊन पाण्याची बाटली उचलली आणि तो चालू लागला.
घामाच्या धारा लागलेल्या. रिक्षा परवडणार नव्हती. जुलै अर्धा झाला तरी पावसाचा टिपूस नाही. पाण्याचे दोन घोट घेऊन तो पुन्हा चालू लागला. चालता चालता संत्याच्या नजरे समोर भुतकाळ सरकायला लागला. या रस्त्याच्या दूतर्फा मोठी मोठी झाडं होती. अगदी दुपारच्या उन्हातही किती थंडावा असायचा. आजुबाजुला आपली माणसं असायची. आपली भाषा ऐकू यायची. पण मग विकास आला.
रस्ते ४ लेनचे झाले. मेट्रोचं जाळ पसरलं. रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेकडो वर्ष जुनी झाडं जमिन दोस्त झाली. जंगल उठवली गेली. सर्वत्र टोलेगंज इमारती उभ्या राहिल्या. शहरा बाहेर मोठे मोठे कारखाने उभे राहिले. शहरं महाग झाली. इथल्या स्थानिक गरिब माणसाला इथे रहाणं परवडेनासे झाले. तो जागा विकून पार कर्जत कसारा विरारच्याही पुढे रहायला गेला.
असाच आपल्या विचारातच संत्या रस्ता क्रॉस करायला गेला आणि अचानक समोरुन मर्सिडिझ बेन्झ भरधाव वेगात आली. ए साला घाटी दिखता नही क्या. गाडीतून आवाज आला. संत्याला पटकन शिवीच आठवेना. आता ओरडून काही बोलायची सवयच राहिली नव्हती. तरी त्याने जोर लावला आणि तुझ्या मायला असा जोरात ओरडला.
अहो, काय झालं. बायकोने त्याला हलवून उठवलं. रात्रीचे दोन वाजले होते. संत्याला घाम फुटला होता.
त्याने कुस बदलली आणि घड्याळ बघितलं. उद्या लवकर उठव गं.
अहो पण उद्या सुट्टी, रविवार आहे ना ?
अगं नाही ग. मुंबईला जायचयं. या आरे च्या वृक्षतोडीला विरोध केलाच पाहिजे. सं
थोडं पाणी प्यायला आणि झोपी गेला.
राजेश कदम
लेखक डोंबिवलीकर आहेत, व्यवसायाने वकील व कर सल्लागार आहे. समाजमाध्यमात सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
Nitin S. Mahajan
खरोखर अशीच स्थिती होणार, आज चे चित्र ही याहून वेगळं नाही, cst स्टेशन च्या बाहेर जितके स्टॉलवाले, टेक्सी वाले, फुटपाथ वर धंदा करणारे आहेत ते सर्व अमराठी भाषिक आहेत.