मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
खरं तर कोकणात जावं की जावू नये हा प्रश्न सतत मनात होता. नव्याने व्यवसाय सुरू केला आहे.अनुभव कमी, म्हणून अनुभव घेण्यासाठी कोकणात जावं म्हटलं. खूप नवीन प्लॅन, आशा आणि उत्साहाने गेले होते.
गेल्यावर आमची चागलीच सोय आत्याबाई असलेल्या अंजना माळी यांच्याकडे करण्यात आली. घर तुमचंच आहे. घरासारख्या राहा.असं सांगून त्या निघूनही गेल्या. त्यांचं आणि अआमचं ट्यूनिंग मस्तच जमलं. चार दिवस थोडी आशा, थोडी निराशा यामध्येच गेले. पण शिकले मात्र खुप…!!
बाहेर गावी गेल्यानंतर आपण घरातून निघण्यापासून ते घरी येईपर्यंत प्लॅनिंग असलंच पाहिजे. आपण आपलं प्रॉडक्ट वस्तू कोणाला विकणार आहोत, त्याची गरज आहे का ? हे माहीत करून घेतलं पाहिजे. वस्तूचा भाव कसा ठेवावा, जेणेकरून आपल्याला आपलं प्रॉफिट निघालं पाहिजे. समोरच्या महिलेची मानसिकता ओळखता आली पाहिजे. अर्थात ती अनुभवावरून येते. आपण ग्राहकांशी बोलताना कसं बोललं पाहिजे. याचा मला तर नक्कीच अंदाज आला.
आपली वस्तू प्रॉडक्ट कसं चांगलं आहे. हे ग्राहकाला पटवून देता आले पाहिजे. ते सरावाने जमतंच !
मी कोकणातील देवरूख येथील संक्रांती उत्सवात भाग घेतला होता, की जो महिलांचा होता. इथे प्रत्येक स्टॉल महिलांच्या मालकीचा होता. महिला सगळे व्यावहार करत होत्या. कोरोना नंतरच एकूण सगळं चित्र बऱ्यापैकी छान होत.
पण मनाला पडलेला एक महत्वाचा आणि गहन प्रश्न असा आहे की, ज्यावेळेस माझ्याकडे महिला किंवा स्री कुर्ती घ्यायला येते. तेव्हा तिच्या मनामध्ये निर्माण होणारे प्रश्न बघा ह..
यांना स्लिव्हलेस आवडत नाही. यांना हा कलर आवडत नाही. यांना अशा प्रकारचे टॉप चालत नाहीत. यांना दाखवते मग सांगते .एक दोन महिलांना तर माझ्याकडे असणारी ब्राऊन रंगाची कुर्ती इतकी आवडली की, ती घ्या म्हणून हट्ट करत होती ; पण त्याला आवडलं नाही म्हणून घेतला नाही.
तर एकूण दुहेरी फायदा झाला. व्यावसायिक फंडे आणि स्रीच्या आणखी जवळ जाता आले. एकूण सगळा विचार करता स्नेह परिवार सोबत मजेत चार दिवस गेले. नव्याने उद्योगिनी मैत्रिणी जोडल्या गेल्या.
रूबिना चव्हाण या अतिशय प्रेमळ, जबाबदार मैत्रिणीची भर मित्र यादीत झाली. व्यवसाय तर करायचा आहे, कोरोना नंतरची परिस्थिती पाहता फारशी विक्री झाली नाही. पण नव्याने माणसं आणि ती पण हक्काची माणसं जोडली गेल्याचा आनंद आहे.
अलिबाग