मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद असल्याने शिक्षकांची विनाकारण शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती कशाला ? असा सवाल करून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई व एमएमआर क्षेत्रातील शाळा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभव लक्षात घेता ३१ डिसेंबर पर्यंत बंद असल्याची घोषणा परवा शिक्षणमंत्र्यांनी केली. तरीसुद्धा शाळा प्रशासन २९ ऑक्टोबर रोजीच्या शालेय शिक्षण उपसचिवांनी काढलेल्या शासन परिपत्रकाचा आधार घेत शिक्षकांना रोज ५० टक्के उपस्थितीची सक्ती करीत आहे. अनेक शाळांनी तसे नियोजन शिक्षकांना कळविले आहे.
शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी घरी, त्यामुळे ऑनलाईन अध्यापन कसे होईल ? जर शाळेत विद्यार्थीच नसतील तर ५० टक्के उपस्थितीची सक्ती करण्याला काय अर्थ आहे ?
पहिल्या लॉकडाउनपासून शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉप, डेस्कटॉप, ट्रायपॉड, ब्लॅकबोर्डसह अन्य आवश्यक वस्तू घेऊन घरी सेटअप उभारला आहे. यामुळे ऑनलाईन अध्यापन घरून प्रभावी होत असल्याने शाळेत जाण्याची सक्ती शासन का करतेय ? या निर्णयामुळे शिक्षकांना रोज प्रवासाची दगदग करावी लागणार आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणेसह एमएमआर क्षेत्रात जवळपास ६५ ते ७० हजार शिक्षक आहेत. यातील बहुतांशी शिक्षक लोकल, बस व इतर सार्वजनिक वाहतुकीने अप डाउन करीत असतात.
५० टक्के उपस्थिती रोज धरली तर साधारण ३० ते ३५ हजार शिक्षक रोज प्रवास करतील यामुळे लोकलसह इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विनाकारण ताण पडेल गर्दीमधून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
जर घरूनच शिक्षक व्यवस्थितरीत्या प्रभावीपणे ऑनलाईन शिक्षण देत असताना ५० टक्के उपस्थिती हवीच कशाला ? असा सवाल करून शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीचा निर्णय तातडीने मागे घेऊन शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.