मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
३ जून रोजी झालेल्या निसर्ग वादळामुळे समुद्रालगतच्या असणाऱ्या गावांना प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. लोकांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे, पण ते मानसिकरित्याही खचून गेले आहेत. सगळं शांत आहे, पण उद्ध्वस्त सभोवतालाच्या रुपात निसर्ग वादळ आजही डोळ्यासमोर थैमान घालतंय.
अलिबागला फिरायला आल्यानंतर लोक नागाव बीच वर आधी जातात. नागाव बीच लोकप्रिय आहे. तिथेच नागाव बंदरात सुनंदा चंद्रकांत मोरे या आजींशी बोलणे झाले.
वादळं सुरू झाले तेव्हा आजी बाहेर कामाला गेल्या होत्या. घराच्या ओढीने त्या लवकर काम आटोपून घरी निघाल्या होत्या. पण घरी पोहचण्यापूर्वीच वादळाने जोर धरला आणि त्या शेजाऱ्यांच्या घरातच आश्रयाला थांबल्या. त्यांचे पती आणि मुलगीसुद्धा दुसऱ्यांच्या घरी थांबले होते.
शेजाऱ्यांनी आम्हाला घरी जाऊ दिलं नाही. घरी गेलो असतो तर आमचा जीव गेला असता. वादळाचा जोर कमी झाल्यावर त्या घरी आल्या. मुलगी आणि त्या अक्षरशः रडल्या. घराचे छत उडून गेले. सगळे कपडे, बिछाना ओले झाले होते. हातभार पाणी घरात साचले होते. एका बाजूची भिंत पडून गेली होती. त्यांच्या उत्पन्नाचे साधन असणारी नारळ फणसाची वाडी कोलमडून पडली होती.
ग्रापंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केलाय. विद्युत पुरवठा अजूनही सुरू झालेला नाही. जागोजागी खांब पडलेले आहेत.
सुनंदा यांची मुलगी सरिताच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते.
आता आम्ही काय करू? हे नुकसान कसे भरून काढू? सरकार आमची मदत करणार आहेत का?
असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत.
सरकार मदत करेल…ती त्यांच्यापर्यंत पोहचेल..या गोष्टी पूर्ण होतील तेव्हा होतील; पण झालेल्या आर्थिक नुकसानी बरोबर त्यांचे मानसिक खच्चीकरण ही या निसर्गवादळामुळे झालेले आहे. वादळाचं भय त्यांच्या डोळ्यात आजही आहे !
मिडिया भारत न्यूज च्या अलिबाग प्रतिनिधी तसंच कायद्याने वागा लोकचळवळीच्या अलिबाग तालुका समन्वयक, सामाजिक कार्यकर्त्या व व्यवसायाने शिक्षिका आहेत.