सुषमा अंधारे महाराष्ट्रातील राजकारणातलं सध्याचं सर्वाधिक चर्चेतलं नाव आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शिवसेनेत आणलं आणि शिवसेनेला पहिल्यांदाच बहुजनांची भाषा बोलणारा चेहरा सापडला.
उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंकडे उपनेतेपद सोपवलं आणि त्यांनी महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा सुरू केलीय. त्यातील सुषमा अंधारेंच्या भाषणांनी शिवसेनेला पुरोगामित्वाची भूमिका दिली.
नेतेमंडळी पक्षांतर करत असताना महाराष्ट्रातील एक मोठी लोकसंख्या शिवसेनेकडे राजकीय पर्याय म्हणून बघू लागली, त्यात शिवसेनेच्या बदलल्या भूमिकेचा आणि उद्धव ठाकरेंच्या भाजपा विरोधातील स्पष्ट भूमिकेचा जितका वाटा आहे, तितकाच ती भूमिका अधिक उलगडून सांगणाऱ्या सुषमा अंधारेंचाही आहे.
भाजपाच्या आयटी सेलने सुषमा अंधारेंचे जुने शिवसेनाविरोधात बोलतानाचे जुने विडिओ उकरून काढले. त्याने फरक पडत नाही म्हटल्यावर शिवसेनेतील जुन्या महिला नेतृत्वाला असुरक्षित वाटेल अशा बातम्या पेरून फूट पाडायचा प्रयत्न केला. काही पक्षाघात झालेल्या भाऊंकडून सुषमा अंधारेंमागे भाजपाच असल्याची बुद्धीभेद करणारी मांडणी करून पाहिलं. सभांवर बंदीचं अस्त्र उगारलं.
शेवटी मनुवाद्यांनी लढाई जिंकायची तर बाईचं पातिव्रत्य भ्रष्ट करायचं पुराणकालीन हत्यार बाहेर काढलं. वर्तमानात त्याचं स्वरुप चारित्र्यहननाचं आहे. बदनामीचं आहे. झाडाआडून बाण मारायची थोर परंपराही सोबत आहे. शिंदे-भाजपाने हाताशी धरलं वैजनाथ वाघमारे यांना.
वैजनाथ वाघमारे सुषमा अंधारे यांचे पती ! आता विभक्त झालेत. त्यांची राजकीय पार्श्वभूमी काहीच नाही. पण त्यांनी माध्यमांना ज्या मुलाखती दिल्यात, त्यावरून त्यांचा राजकारण प्रवेश कशासाठी झालाय ते स्पष्ट होतं.
वाघमारे म्हणालेत : सुषमा अंधारे तोफ वगैरे काही नाही ! ती काय आहे, ते मी बाहेर काढणार आहे !
ही सुषमा अंधारेंना शिंदे-भाजपाने वाघमारे मार्फत दिलेली धमकीच आहे. मनोधैर्य खचलं की हल्ला करायला सोपा जातो. त्यात समोर स्त्री असली की बदनामीने तिला नामोहरम करता येतं. पावित्र्य सिद्ध करण्यासाठी स्त्रीला आगीत उभं करणारी क्रूरता ज्या समाजात संस्कृती म्हणून मिरवते, त्या समाजात स्त्रीची नाकेबंदी केली जाण्याला लोकमान्यता असणं साहजिक आहे. पण सुषमा अंधारेंमागे महाराष्ट्रातला सुजाण वर्ग पाठीशी उभा राहिलेला पाहायला मिळातोय.
सुषमा अंधारेंशी वैचारिक मतभेद असलेले लोकही त्यांच्या भोवती रचल्या जात असलेल्या नीचनीतीचा निषेध करताना दिसतायंत.
या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यांनी आपल्या मुलीला खुलं पत्र लिहिलंय. त्या म्हणतात -
प्रिय कब्बु,
तू फक्त 45 दिवसांची होती तेव्हाचा हा फोटो आहे. मला एक दिवसासाठी दुबईला जावं लागणार होतं.. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी दुबईला जायचं होतं आणि तुझा पासपोर्ट तयार नव्हता.
पण अख्ख कुटुंब पाठीशी उभा राहिलं...विशालमामाने अत्यंत प्रेमाने तुला पोटाशी धरलं अन् मला एकटीला निरोप दिला. दुबईत दोन तास बोलून मी आल्या पावली घारी सारखी तुझ्याकडे झेपावले.
बाळा, तुझ्या आईने जुन्या मळवाटेने जायचं नाकारले आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्ताळणार आहेत.. बेहत्तर.. पण तूझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय..!
तुला याचा अर्थ किती समजेल हे आत्ता सांगता येणार नाही पण तरीही आपल्या पाच-पन्नास पिढ्यांना ज्यांनी नवा मार्ग दाखवला ते बाबासाहेब इथल्या पितृसत्ताक आणि मनुवादी व्यवस्थेबद्दल बोलताना फार चांगलं विश्लेषण करतात,.
बाबासाहेब लिहितात, " जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील.. भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत. त्यांच्या धाक दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील. पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..! भय , भ्रम , चरित्र हत्या हि मनुवादी अस्त्र आहेत यांच्यापासून सावध राहा "
सुषमा अंधारेंचं हे पत्र प्रचंड प्रसारित होतं आहे. त्यांना कोंडीत पकडण्याच्या धडपडीत शिंदे-भाजपा जनमानसातील उरलीसुरली सहानुभूतीही गमावून बसलीय. शिखंडीमागे दडून वार करण्याचा डाव शिंदे-भाजपावरच उलटताना दिसतो आहे.