मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
उल्हासनगरातील सम्राट अशोक नगरवरची संचारबंधनं उठवण्यात आलीत. प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जागोजागी उभारण्यात आलेले अडथळे काढून टाकण्यात आले. गेले दीड महिना सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील प्रत्यक्ष युद्धात अखेर शिवाजीचा गनिमी कावा कामी आला.
दाटीवाटीची वस्ती असलेल्या सम्राट अशोक नगरात ५ मेला पहिला रुग्ण सापडला आणि बघता बघता संख्या वाढत ऐंशीच्या वर गेली. सुरुवातीला प्रशासनाकडे डोळे लावून असलेल्या स्थानिक नगरसेविका सविता तोरणे आणि त्यांचे बंधू स्थानिक सामाजिक कार्यकर्ते #शिवाजी_रगडे यांनी प्रशासनाचा मर्यादित प्रतिसाद पाहून स्वत:ची अशोका फाऊंडेशनची #super60 फळी उभी केली. त्यांची वैद्यकीय सुरक्षेची काळजी घेतली.
कोरोनाचा वस्तीतला प्रवेश आणि प्रसार यांची नाकेबंदी करणारा #गनिमीकावा आराखडा त्यांनी तयार केला. सहकाऱ्यांच्या #सुपरसिक्स्टी चमूमुळे वस्तीतला संचार चहुबाजूंनी बंद असतानाही नागरिकांची कुठलीही गैरसोय झाली नाही. काय हवं ते आम्हाला सांगा, पण घरातून बाहेर पडू नका, अशी ठाम भूमिका रगडे यांच्या चमूने घेतली होती.
इतकंच नव्हें, तर विलगीकरण केलेल्या ठिकाणीही या चमूने नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवला. त्यामुळेच एकेक रुग्ण बरा तर होत गेला, पण नवीन वाढला नाही. अखेर सम्राट अशोक नगर आज पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊ लागलंय.
शक्ती नसते तिथे युक्ती कामी येते, ही रणनीती आपल्याला छत्रपती शिवरायांनी शिकवलीय. शत्रूची कोंडी करून आक्रमणाचा #गनिमी_कावा आम्ही वापरला, असं शिवाजी रगडे यांनी सांगितलं. या मोहिमेत सहकार्य करणाऱ्या उल्हासनगर मनपा आयुक्त, अधिकारी, प्रशासन आणि नागरिकांचेही त्यांनी आवर्जून आभार मानले.
News by MediaBharatNews Team