डोंबलाचा लव्हजिहाद !

डोंबलाचा लव्हजिहाद !

डोंबलाचा लव्हजिहाद !

उत्तरकाशीतील पुरोला शहर तब्बल तीन आठवडे तणावाखाली आहे. निमित्त आहे लव्हजिहादचं ! अर्थात कथित लव्हजिहादचं !! आजकाल एखाद्या प्रकरणात आरोपी मुस्लिम असला की त्याला लव्हजिहादचा मुलामा चढवायचा आणि त्या आडून विद्वेषाचं राजकारण करायचं हा आता भारतातील हिंदुत्ववाद्यांचा एक रिकामटेकडा उद्योगच झाला आहे.

तो करत असताना समाजासोबतच पोलीस यंत्रणाही वेठीला धरली जाते. जनजीवन विस्कळीत होतं. व्यवसायांवर त्याचा विपरीत परिणाम होतो ; परंतु सडेलमेंदूतील घाणेरडं राजकारण करणाऱ्यांना समाजस्वास्थाशी काहीही देणंघेणं नसतं. 

उत्तरकाशीतील पुरोलामधील एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात दोन आरोपी होते. एकाच नाव जुबेद खान आणि दुसऱ्याचं जितेंद्र सैनी ! 

मुलगी आई वडिलांचं निधन झाल्यानंतर आपल्या मामासोबतच राहात आहे. मामाला आलेल्या एका कॉलनुसार आरोपी मुलीचं अपहरण करण्याच्या प्रयत्नात होते. मामाने घटनास्थळी धाव घेतली तिथे ते दोघेही पळून गेल्याचं मामाला सांगण्यात आलं. मामा त्या दोन्ही मुलांना पूर्वीपासून ओळखत असल्याने त्याने दोघांच्या घरी जाऊन विचारपूस करण्याचा प्रयत्न केला; परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं.

ही घटना पसरल्यानंतर ताबडतोब हिंदुत्ववाद्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आणि सदर प्रकरणात जबरदस्तीने हस्तक्षेप करत घटनेला लव्हजिहादचं वळण देण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र सैनीचं नाव बाजूला काढून जुवेद खानलाच आरोपी करण्याचा हिंदुत्ववाद्यांचा डाव होता. त्यांनी एक अर्ज तयार केला होता. मुलीचं अपहरण करून तिला देह व्यापारात ढकलण्याचा जुबेरचा डाव होता असा आरोप अर्जात करण्यात आला होता परंतु मुलीच्या मामाने या अर्जाला आक्षेप घेतला व तो अर्ज पोलिसांसमोरच फाडून टाकला. त्यानंतर जुबेद खान आणि जितेंद्र सैनी यांच्याविरोधात मुलीचं अपहरण करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.

मात्र असं असतानाही पुरोलामध्ये मुस्लिमांविरोधात तणावाचं वातावरण निर्माण करण्यात आलं आणि त्यांच्या जागा खाली करण्यासाठी त्यांना धमकावण्यात आलं. त्यानुसार तीस-पस्तीस मुस्लिम कुटुंबं पुरोला सोडून भीतीने निघूनही गेली.

पुरोलामध्ये वेगवेगळे हिंदुत्ववादी संघटनांचे राजकीय नेते येऊन तिथे भाषणबाजी करणं व तणावात भर घालणं नित्याचं होऊन गेलं होतं. याला कंटाळून मुलीच्या मामाने स्वतःला घरात कोंडूनही घेतलं होतं. परंतु 'दैनिक भास्कर' ने घटनास्थळी जाऊन हिंदुत्ववाद्यांच्या विखारी राजकारणाचा पर्दापाश केला आहे.

मुलीच्या मामाने दैनिक भास्करला दिलेल्या वक्तव्यातून कथित लव्हजिहाद घटनेची पोलखोल झाली आहे. पोलिसांनीही या प्रकरणात लवजिहादचा रंग असल्याचा इन्कार केलेला आहे.

पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन रेकॉर्ड तपासले असता ते मुलीशी बोलत असल्याचं किंवा संपर्कात असल्याचं किंवा त्यांची ओळख असल्याचं दिसून आलेलं नाही.

मुख्य म्हणजे पुरोला बाजारातील सर्व सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता मुलीचं अपहरण होत असल्याचीही कुठलीही घटना सीसीटीव्हीत आढळून आलेली नाही. मुलीच्या मामाने हा सगळा राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार असल्याचा आरोप केलाय व घरं सोडून गेलेल्या मुस्लिमांना पुरोलात परतण्याचं आव्हान केलंय.

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!